
शिवसेना ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव हे पक्षावर नाराज असून, ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र त्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत या चर्चांमुळे मी अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण कुठेही जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारी आणि अंमली पदार्थांच्या विरोधात भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय बानू चीबजी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले.
महापालिकीच्या निवडणुकीला लागा, असे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना आज पुण्यात दिले. तसेच पुढील दोन महिन्यात म्हणजे एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे देखील बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकी लढण्याचे देखील संकेत दिले आहेत.
प्रयागराज येथील कुंभमेळाव्यात स्नान करून अयोध्येला दर्शनासाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. यात चार जण ठार तर एकोणीस भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व भाविक महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील बारांबाकी जिल्ह्यात हा भीषण अपघात घडला.
आमदार भास्कर जाधव हा रांगडा माणूस आहे. एकनाथ शिंदे यांच्या स्वभावाशी त्यांच्या स्वभाव मॅच होतो. उबाठाच्या नेत्यांनी आता त्यांना कितीही साहेब म्हटले, किंवा आरत्या ओवाळल्या तरी ते तिथे थांबणार नाहीत, ते योग्यवेळेची वाट पहात आहेत, अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचे संकेत दिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोकणातले आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात नुकताच प्रवास केला. त्यानंतर आता भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा आहे. आपल्या क्षमेतेनूसार संधी मिळाली नाही, असे म्हणणाऱ्या जाधव यांनी आता आपण एकूणच आतापर्यंतच्या 46 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल बोललो होते. कोणत्या पक्ष किंवा नेत्याचे आपण नाव घेतले नाही, अशी सारवासारव केली आहे.
कोकणात शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा हादरा दिला. या शिवाय मिशन टायगर अंतर्गत उबाठा चे सहा खासदार शिंदेसेनेत जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पक्षात आणखी काही जणांचा प्रवेश होणार आहे, पण त्यांची नावे आताच सांगणार नाही, असे म्हणत सस्पेंस वाढवला आहे.
शेतात काम करणाऱ्या, घरगुती काम, धुणीभांडी, भाजी विक्रेत्या, स्वयंपाक करणाऱ्या गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे. चाळीस हजार पगार, चार चाकी वाहन असणाऱ्या अनेक महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला. ज्यांना आधी पैसे दिले ते परत घेणार नाही, ओवाळणी परत घेण्याची आपली परंपरा नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारीचा हप्ता लवकरच बँकेत जमा करणार, असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण दाबले जाणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणात कोणीही दगाफटका करु नये, एकही आरोपी सुटता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. जेव्हा एखादा आरोपी सुटतोयं असं वाटेल तेव्हा मी आणि माझ कुटुंब टोकाचा निर्णय घेऊ, अशा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदनामी आणि खोट्या आरोपाने मन व्यथीत होते. सिंचन घोटाळ्यात माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता. पण धनंजय मुंडेंच्या बाबतीत त्यांनी बीडच्या खून प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील कोतवालबड्डी परिसरातील एका एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जळगावमधील राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता 'ईडी'ने जप्त केल आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे हे ज्वेलर्स आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या थकीत कर्जप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स मालमत्ता जप्त केली आहे.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येत वाँटेड असलेला कृष्णा आंधळे याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात न्यायालयात अर्ज केला होता. पाच वाहने आणि धारूर, केजमध्ये मध्ये त्याची बँक खाती आहेत.
न्यू इंडिया को-ऑप बँकेत 122 कोटींची अफरातफर केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक व लेखा प्रमुख हितेश मेहताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीकडून योग्य त्या जागा मिळाल्या नाहीतर, स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री रामदास आठवले यांनी दिली. लोकसभा आणि विधानसभेला जागा मिळाल्या नाहीत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळतील, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.
नाशिक महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर झाले आहे. 3 हजार 53 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केले. प्रशासकीय राजवटीत सादर होणारे हे तिसरे बजेट आहे. मालमत्ता कर दोन टक्क्यांनी वाढ सुचवली आहे. 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ सुचवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची पुणे इथं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली. या भेटीमुळे गदारोळ झाला असतानाच, आमदार क्षीरसागर यांनी पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचे सांगितले. तसेच अजित पवार यांनी मी बीडचा पालकमंत्री आहे, त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी माझी भेट घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि राज्याचे वन मंत्री गणेश नाईक हे जनता दरबार घेणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारी रोजी गणेश नाईक हे ठाण्यात जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या, अडचणी समजून घेणार आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही मंत्र्यांनी नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा, असेही नाईक यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बदलापूरमध्ये आपली ताकद दाखवली आहे. बदलापूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी बोलून दाखवला.
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेते सोडून का चाललेले आहेत, याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे, असे आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. जुन्नरमध्ये अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा व अतिरिक्त सत्र आणि दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री पवार हे प्रथमच जुन्नरच्या दौऱ्यावर येत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कालच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. मला शिवसेनेने माझ्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी दिली नाही, असे म्हटलेलं नाही. कोणत्याही पक्षाचे नाव मी घेतलेलं नाही, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपच्या सक्रिय सदस्य नोंदणी कार्यक्रम आज पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित होत आहे. दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पुण्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थांबाबत बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला असतानाची घटना ताजी असताना पूर्वांचल एक्सप्रेसवर खासगी बस आणि ट्रेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हे चारही जण महाराष्ट्रातील असून ते महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जात होते.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्याच्या नावावर 5 वाहने तसेच धारूर आणि केजमध्ये बँक खाते आहेत. ही सर्व संपत्ती आता जप्त होणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ६५ दिवसांनंतरही तो फरार आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत कुंभमेळ्यासाठी निघालेल्या 18 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तर चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गाव येथे शेंदुर्णी एज्युकेशन को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नवीन इमारतीचा शुभारंभ, शेतकरी मेळावा आणि जामनेर येथील नमो कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभासाठी ते जळगावला जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर या न्यायालयाचं आज अजित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन केलं जाणार आहे.
नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलिस आणि RPF जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसंच गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे खूप दुःख झाले असून ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं म्हणत या घटनेवर त्यांनी शोक व्यक्त केला.
नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत"; अशी मी प्रार्थना करतो, असं ट्वीट मोदींनी केलं आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री मोठी दुर्घटन घडली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. हे सर्वजण रेल्वेची वाट पाहात असताना अचानक प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे जालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याची माहिती आहे. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर ही चेंगराचेंगरी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.