
बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आमदार सुरेश धस यांचे एक प्रकरण बाहेर काढले आहे. त्यांनी धस यांच्या विरोधात कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. त्यानंतर राम खाडे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. दरम्यान खाडे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक त्यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले असल्याचे सांगितले आहे. माझ्या जीवितास आमदार सुरेश धस, पत्नी प्राजक्ता धस, देविदास धस यांच्यासह अनेकांकडून धाेका आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण पूर्ववत करण्यात यावे' अशी प्रतिक्रिया राम खाडे यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवांनंतर कॉँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचे जवळचे समर्थक आणि गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.हलमारे यांनी पाटोले यांवर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताकदिन निमित्त 26 जानेवारी 2025 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर साजरा केला जाणार आहे. राज्यात एकाच वेळी सकाळी 09.15 वाजता ध्वजारोहण केलं जाणार असून जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मिरा भाईंदरमध्ये भाजप, काँग्रेस, शिंदेगटाला गळती लागली आहे. येथील पदाधिकाऱ्यांनी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी वॉशिंग्टनमधील एका खाजगी स्वागत समारंभात हजेरी लावली. त्यांनी अमेरिकेचे ४७ वे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले. ट्रम्प यांचा शपथविधी समारंभ सोमवारी (ता.20) होणार आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख सहसंपर्कप्रमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहरात 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा वर्धापन दिन आणि 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त भगवा पंधरवाडा राबवला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या अनुदानीत आहेत. पण ते अनुदान राज्याला मिळत नाही, अशी खदखद कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व्यक्त केली आहे. तसेच केंद्राकडून अनुदान न मिळाल्यानेच शेतकऱ्यांना अनुदान देता येत नाही. पण अजित पवार यांच्याकडून काही तरतूद झाल्यास पुढील आठवड्यात देऊ असेही नाशिक येथे कृषीमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्याआधी पालकमंत्रिपदावरून पडदा उठवला आहे. त्यांनी पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या केल्या आहेत. यानंतर महायुतीत धुसफूस सुरू झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. तर याचे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून त्यांचा दरे गावाचा दौरा आहे. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
गेल्या महिन्याभरापासून प्रतिक्षेत असलेली पालकमंत्रीपदाची यादी शनिवारी (ता.18) संध्याकाळी जाहीर झाली. यावेळी रागयडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना देण्यात आले. तर मंत्री भरत गोगावले यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यांना इतरही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष व्यक्त केला आहे. 32 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. यात शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात जन आक्रोश मोर्चांना सुरूवात झाली आहे. आज देखील (ता. 19) छत्रपती संभाजी नगरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा घणाघाती प्रहार केला.
नागपुरात देवडिया भवन येथे युवक काँग्रेसने जोरदार आंदोलन केले आहे. युवक काँग्रेसने, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केले आहे. तर भागवत यांनी, खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य हे राम मंदिर बनल्यानंतर मिळाल्याचे म्हटले होते.
प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभ मेळ्यात दाखल झाले असून त्यांनी पाहणी केली आहे. दरम्यान आग आटोक्यात आणण्यात आली असून कोणत्याही जीवितहानी झालेले नाही.
प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून 20 ते 25 तंबू जळून खाक झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घटनास्थळी दाखल झाले असून ते पाहणी करत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधात युवक काँग्रेसकडून नागपूरमध्ये आंदोलन केले जात आहे. कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली अचानक हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली.
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, आगीमध्ये 20 ते 25 तंबू जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली होती.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आग आटोक्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात सेक्टर 19 मध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये अनेक तंबू, साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा म्हणतोय, त्यांच्या वडिलांचा खून करणारे आरोपी वेगळेच आहेत. यामध्ये बिल्डर लॉबीचा हात असू शकतो, असं सांगत असले तरी त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही. तसंच सैफ अली खानच्या बाबतीत देखील हे प्रकरण दुसरीकडे नेण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे, असो रोहित पवार म्हणाले.
अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याला मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. मोहम्मद शेहजाद असे आरोपीचे नाव आहे. आज त्याला मुंबईतील वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
बीड-परळी मार्गावर पोलिस भरतीची तयारी करत असलेले तरुण पहाटे व्यायामासाठी बाहेर पडले होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने तीन तरुणांना चिरडले. या अपघात या तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. सुबोध बाबासाहेब मोरे (वय 20) , विराट बब्रूवान घोडके (वय 19) आणि ओम सुग्रीव घोडके (वय 20) असे या तरुणांचे नाव आहे.
प्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान यांच्या वर जीवघेणा हल्ला प्रकरणी हल्लेखोर मोहम्मद शहजादला पोलिसांनी वांद्रे कोर्टात हजर केले होते. त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.न्यायालयाने मात्र पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले. लाडक्या बहिणींचा यात सिहांचा वाटा होता असे बोलले जाते. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला, परंतु जानेवारीचे पैसे अद्याप मिळाले नाही. हे पैसे येत्या 26 जानेवारीच्या आत मिळतील, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
कुणबी आणि क्षत्रिय आम्हीच, आमच्या लेकरांना आरक्षणाची गरज आहे. ज्यांना आरक्षण घ्यायचंय ते घेतील ज्यांना नको ते नाही घेणार. कोणी चुकला की आपण कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना सुनावले.
महायुती सरकारमध्ये लवकरच महामंडळाची पदे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते, यावर लवकरच निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मेहनती कार्यकर्त्यांना यावर संधी दिली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात दोन कक्षांची घोषणा केली. वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि वचनपूर्ती कक्ष, हे पक्ष पातळीवर मार्चपूर्वी सुरू करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
धनंजय मुंडे यांची गाडी आज भाषणात सुसाट सुटली होती. मध्यंतरी जे वावटळ उठलं होतं, त्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृतवाने आणि भाषणाने केले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे.
विधानसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात दोन उमेदवारांवर हल्ले झाले होते. ते हल्ले बनावट होते, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप नाईक आणि वसमत विधानसभा मतदारसंघाचे शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावर निवडणुकीच्या काळात हल्ले झाले होते. ते हल्ले बनावट होते, हे आता उघड झाले आहे.
संतोष देशमुख खूनप्रकरणी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. संभाजीनगरधमील क्रांती चौकात देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीय दाखल झाले आहे. तसेच, विरोधी पक्षनेते अंबदास दानवे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार इम्तियाज जलील हे नेतेमंडळी मोर्चा निघणाऱ्या ठिकाणी म्हणजे क्रांती चौकात हजर झाले आहेत. याशिवाय मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धसही या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. हा मोर्चा क्रांती चौकातून सिटी चौकमार्गे विभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.
मला बदनाम करायचं आहे, तर करा. आणखीन कोणला बदनाम करायचं आहे तर करा. पण माझ्या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्यातील मातीला, बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान वैद्यनाथाचं आहे. त्या वैद्यनाथनगरीला बदनाम करू नका, अशी माझी सर्वांना यानिमित्ताने विनंती आहे, असे आवाहन शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात सहभागी झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील दोनशपेक्षा अधिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव भाऊ चौधरी आणि संपर्कप्रमुख विजय करंजकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा झाला आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला सध्या खार पोलिस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं आहे. थोड्याच वेळात त्याची वांद्रे येथील भाभा रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी करून वांद्रे न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मंत्री धनंजय मुंडे सहभागी झाले आहेत. मंत्री मुंडे शिबिरात सहभागी होणार की, नाही होणार, याबाबत संभ्रम होता. त्यातच काल पालकमंत्र्यापदाच्या नियुक्ती जाहीर झाल्या. त्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवारांनी स्वतःकडे घेतली आहे.
राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. पालकमंत्रिपदी नियुक्ती होताच बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते पश्चिम विदर्भाचा महसूल विभागाचा आढावा घेणार आहेत.
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर तळेगाव टोलनाक्याजवळ शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे रविवारी पहाटे चार वाजता शिर्डीत दाखल झाले आहेत. त्यामुळे काल नवसंकल्प शिबिराला गैरहजर असणाऱ्या मुंडेंनी आज मात्र हजेरी लावली आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर ते आज पहाटेच शिर्डीत दाखल झाल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर धनंजय मुंडे आणि अजित पवार दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबिय मस्साजोगमधून संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत.
रायगडचे पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद न दिल्यामुळे रायगडमध्ये जोरदार राडा झाला आहे. नाराज गोगावले समर्थकांनी शनिवारी रात्री काही काळासाठी महामार्गही रोखला होता
महायुती सरकारची पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. यात बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे देण्यात आलं आहे. यानंतर बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंना न मिळाल्याची चर्चा सुरू होती. अशातच त्यांनी ट्विट करत बीडचं पालकत्व अजितदादांनी घ्यावं अशी मीच त्यांना विनंती केली होती, असं सांगितलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, मीच अजितदादांना बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली होती. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल, असा मला विश्वास आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.