
Mohan Bhagwat News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. नागपूरमधील विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. मात्र, भागवतांच्या भाषणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधून टीका करण्यात आली आहे.
'लोकशाही मार्गानेच बदल शक्य आहे, पण लोकशाही, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट हुकूमशहाच्या कोठ्यावर मुजरे झाडू लागतात तेव्हा काय करायचे सरसंघचालकांनी देशाला यावर मार्गदर्शन करणे आवश्यक होते. मोदी-शहांच्या कारभाराचे तुणतुणे वाजवायला डरपोक आणि भाडोत्र्यांची मोठी फौज आहे. भागवतही त्यात सामील झाले. 'भागवत, तुम्हीसुद्धा ?' हा राष्ट्रभक्त जनतेचा सवाल आहे.', असे 'सामना'त म्हटले आहे.
'भागवत यांनी केलेले मार्गदर्शन खरे की हिंदू-मुसलमानांत सतत हिंसा भडकवून द्वेषाचा वणवा पेटवणारे 'भाजप'चे राजकारण खरे? मोदी-शहांचे राज्य ही संघाची स्वप्नपूर्ती आहे. देशातील एकात्मता संपवून येथे सहिष्णू हिंदूंचे नव्हे, तर धर्मांध, बुरसटलेल्या विचारांच्या हिंदूंचे राज्य यावे व अशा राज्याला 'हिंदू राष्ट्र' म्हणून मान्यता मिळावी, अशी संघाची धारणा आहे. थोडक्यात संघाला येथे हिंदू मोहम्मद अली जीनांचे राज्य हवे आहे. भारताचा 'हिंदू पाकिस्तान' करणे हे त्यांचे ध्येय आहे व त्यासाठी देशातील व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, संसद यांचा बळी गेला तरी चालेल.' असा हल्लाबोल देखील भागवतांवर करण्यात आला आहे.
'बांग्लादेश, नेपाळ सारखा भारतातही असा जनक्षोभ होईल असे, भय सरसंघचालकांना वाटते. कारण गेल्या दहा वर्षांत मोदी-शहा यांनी जनतेला खोटी आश्वासने दिली. धार्मिक दंगली घडवल्या. संपूर्ण देश अदानीसारख्या लाडक्या उद्योगपतीच्या खिशात घातला. या दरोडेखोरीवर सरसंघचालकांनी प्रखर भाष्य करणे आवश्यक होते. राष्ट्रीय संपत्तीची ही अशी लूट ब्रिटिश काळात वाढली तेव्हा स्वराज्याचे आंदोलन सुरू झाले. लोक बेभान होऊन रस्त्यावर उतरले. गांधींच्या नेतृत्वाखाली लढा झाला व ब्रिटिशांना या देशातून हाकलून दिले गेले. ब्रिटिशांची साम्राज्यशाही नष्ट केल्यावर भारतात लोकांचे राज्य आले. अर्थात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व नंतरच्या राष्ट्र उभारणीच्या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोठेच नव्हता.', असे देखील सामनात म्हटले आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा साधा ओरखडाही संघाच्या वाटचालीवर उठला नाही. तरीही हे लोक स्वातंत्र्य, राष्ट्रवाद वगैरेंवर भाषणे झोडतात याचे आश्चर्य वाटते. संघाला शंभर वर्षे झाली म्हणून त्याच्या नावाने पोस्टाचे तिकीट, खास नाणी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली, पण संघाने निर्माण केलेले भाजपचे नाणे खोटे आणि भ्रष्ट आहे. मोदी-शहांसारखे हुकूमशहा संघाने निर्माण केले व त्यांच्या हुकूमशाहीला बळ दिले हे संघाचे पाप आज देशाच्या बोकांडी बसले आहे. या मंडळींचा राष्ट्रवादाचा बुरखा रोज फाटत आहे, अशी टीका देखील करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, सरसंघचालक मोहनराव भागवतांपासून ते प्रत्येक संघ स्वंयसेवकासाठी ‘देश सर्वतोपरी’ असतो. राहुल गांधी-शरद पवारांच्या मर्जी साठी त्यांच्या ‘होत हो’ मिसळायला ते काय थोडंच उध्दव ठाकरे आहेत का?… की उध्दव ठाकरेंच्या ‘पिपाणी’ला सिंहगर्जना म्हणणारे संजय राऊत आहेत?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.