
Mumbai News: बहुप्रतिक्षित जनसुरक्षा विधेयक पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.10) मांडले. विधानसभेत हे विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलं, तर शुक्रवारी (ता.11) हे विधेयक विधानपरिषदेतही मंजूर करण्यात आलं. पण या विधेयकाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं विरोध दर्शवल्यामुळे मोठा राडा झाल्याचंही पाहायला मिळालं. यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या विधेयकावर गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरातूनच जनसुरक्षा विधेयकावर परखड मत व्यक्त करतानाच सरकारलाही धारेवर धरले. ते म्हणाले, देशविघातक शक्तीचा बिमोड करण्यासाठी हा कायदा आणत असाल तर आम्ही सरकारसोबत आहोत आणि राहणारही. पण तुम्ही राजकीय हेतूने हे विधेयक आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महायुती सरकारनं आणलेल्या जनसुरक्षा विधेयकामध्ये (Jansurksha Act) राजकीय दुरुपयोगाचा वास येत असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कोणासाठी? असा सवाल उपस्थित करतानाच शेंडा बुडका नसलेलं हे विधेयक असल्याचा टोलाही ठाकरे लगावला.
या विधेयकाचे नाव जनसुरक्षा विधेयक असे असले तरी हे विधेयक भाजपच्या सुरक्षेसाठी आणल्याचा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. या विधेयकात नक्षलवाद असा कुठेही उल्लेख नाही.तसेच बेकायदा कृत्य याची स्पष्ट व्याख्या विधेयकामध्ये नाही.त्यामुळे विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा आणत आहात का? असा खडासवाल करतानाच त्यांनी राजकीय हेतूनं हे विधेयक आणू नका असंही ठणकावलं.
या विधेयकाचं जनसुरक्षा विधेयकाऐवजी भाजप सुरक्षा विधेयक नाव ठेवा असा टोमणाही उद्धव ठाकरे यांनी मारला. तसेच याचवेळी त्यांनी हे विधेयक मिसला टाडा प्रमाणेच असल्याचंही सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सत्ताधारी महायुतीनं मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकात कडव्या डाव्या विचारसरणी असा उल्लेख असल्याचं समोर आणलं. या विधेयकानंतर कुणाला कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं. या कायद्याचा राजकीय दुरुपयोग केला जाईल, अशी भीतीही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे या बिलामध्ये नक्षलवादाचा उल्लेख येणं गरजेचं असल्याचे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, जो कोणी भाजपविरोधात बोलेल तो देशद्रोही आहे असं त्यांना वाटत असेल तर ते विकृत मानसिकतेचे आहेत. रस्त्यावर कोणी उतरु नये म्हणू हा कायदा आणत असल्याचा घणाघातही ठाकरेंनी यावेळी केला. कडवे डावे म्हणजे नेमके कोण? असा सवाल करत त्यांनी हे सरकार जनसुरक्षेच्या नावाखाली उद्या कोणालाही आत टाकेल असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.