

Ahilayanagar Municipal Corporation voter list : अहिल्यानगर शहरातील महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घुसवलेले मतदार, दुबार मतदार हा राजकीय कट आहे. पण नगरकरांच्या हक्काच्या मतदानावर गदा आणू देणार नाही. स्थानिक प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसले, तरी आम्ही त्यांच्या मानगुटीवर उभे राहू, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी चिरफाड केली.
शहर मतदार याद्यांमध्ये 4371 श्रीगोंद्यातील आहेत. तसंच 10689 दुबार नाव असून, मतदार याद्यांमध्ये घोळच घोळ आहे. आम्ही हरकती घेतल्या आहेत. दहा तारखेपर्यंत पाहू, नाहीतर या अनियमिततेविरोधात आम्ही न्यायालयीन आपला लढा उभारू, असा इशाराही अभिषेक कळमकर यांनी दिला.
अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार याद्यात (Voter List), एका पत्त्यावर 100–150 मतदार, पुरुषांचे लिंग स्त्री आणि स्त्रीचे लिंग पुरुष, एकच नाव, पण वेगवेगळे फोटो, तीन महिला मतदारांचं एकच नाव, पत्ता अन् वास्तव्याचा पुरावा नसलेले मतदार, बाहेर गावचे घुसवलेले मतदार, दुबार मतदार वेगळे, असा घोळ मतदार याद्यांमध्ये घातला आहे. हा राजकीय कटच आहे, असा गंभीर आरोप अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
अहिल्यानगर महापालिकेने शहरात थेट श्रीगोंद्यातील मतदारांचा समावेश केला आहे. तब्बल 4371 मतदार श्रीगोंद्यातून थेट शहरात जोडले गेले आहे. या मतदारांची नावे कोणतीही कारणे न देता, अहिल्यानगर शहर मतदारसंघात जोडली गेली. या मतदारांना ‘डबल स्टार’ केलं जाणार का? तसंच मतदार यादीत 10689 दुबार नाव आहेत, यावर काय कार्यवाही करणार, असे प्रश्न अभिषेक कळमकर यांनी उपस्थित केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नियमावलीतील हास्यास्पद विरोधाभास घणाघात करताना, “दुबार नाव वगळता येत नाही”, “मतदार याद्यांमध्ये दुबार नाव असणे हा गुन्हा आहे”, या नियमांकडे लक्ष वेधले. दुबार मतदार असतील, तर मग गुन्हेगार कोण? सामान्य प्रामाणिक नागरिक? की यादी बिघडवणारे प्रशासन? असे प्रश्न कळमकरांनी उपस्थित केले.
ही विसंगती नागरिकांना बळीचा बकरा बनवते. IT मध्ये भारत आघाडीवर, पण निवडणूक आयोगाकडे Auto-Updation का नाही? देश माहिती-तंत्रज्ञानात जगात अग्रस्थानी असल्याचा दावा करत असताना, मतदार याद्या हाताने तपासल्या जात आहेत! निवडणूक आयोगाकडे Auto-Updation सॉफ्टवेअर नसणे ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. तंत्रज्ञान प्रगतीत पुढे आणि मतदार यादीत मागे? यामुळे मृत, स्थलांतरित, लिंग बदल, फोटो बदलेले मतदार कायम राहतात, हे कळमकरांनी पुराव्यासह दाखवले.
'जेरीमैंडरिंग' ही अमेरिकन संकल्पना असून तिथं सत्ता टिकवण्यासाठी मतदारसंघांची कृत्रिम फेर रचना केली जाते. तसाच प्रकार अहिल्यानगरमध्ये होत असल्याचा गंभीर आरोप कळमकरांनी केला. आयुक्तांवर दडपण टाकून सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचना स्वतःच्या मनाप्रमाणे बदलून घेतली आहे. पुढे होऊ घातलेल्या Delimitation प्रक्रियेलाही हाच धोका, असे कळमकर यांनी म्हटले.
भारतीय लोकशाहीचे मूळ तत्व एक व्यक्ती, एक मत, असं आहे. परंतु मतांवर गंडलेला हा खेळ नागरिकांना प्रचंड तोटा देणारा आहे. आज तुमच्या मताला किंमत आहे म्हणून तुम्हाला योजना, सवलती मिळतात. उद्या जर सत्ताधाऱ्यांना खात्री झाली की, ते तुमच्या मतांशिवाय जिंकू शकतात. तर तुमच्या अधिकारांची किंमत शून्य होईल. स्थानिक प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसले, तरी आम्ही त्यांच्या मानगुटीवर उभे राहू. आम्ही न्याय मागणार नाही, न्याय देणार, असा इशारा अभिषेक कळमकर यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.