
Maharashtra political : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांचा सर्वाधिक वेळ परदेशात जातो. त्यामुळे त्यांना देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला वेळ लागेल. \
देशातील निवडणूक प्रक्रियेविरोधातील त्यांची विधाने म्हणजे मतदारांचा अपमान आहे, अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, मागील दोन लोकसभा निवडणुकांत काँगेस (Congress) पक्षाने जेमतेम चाळीस जागांपर्यंत मजल मारली होती. यंदा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या जागा चाळीसवरून शंभर वाढल्या, हे फिक्सिंग होते का? आंध्र आणि हिमाचल राज्यात आलेले त्यांचे सरकार फिक्सिंग समजायचे का?
निवडणूक प्रक्रियेविरोधात विधान करून खासदार गांधी स्वतःचे हसे करून घेत आहेत. लोकसभेची निवडणूक (Election) खोटे नॅरेटिव्ह पसरवून केली गेली. काही ठिकाणी त्याचा परिणाम पाहायला मिळाला.
विधानसभा निवडणुकीची राजकीय परिस्थिती मात्र वेगळी होती. महायुतीला राज्यातील मतदारांनी कौल दिला. मात्र, मतदारांचा सातत्याने अपमान करण्याचे काम खासदार गांधी यांच्याकडून होत आहे. त्यांनी देशात वेळ दिला, तर त्यांना राजकीय परिस्थितीची माहिती होईल, असेही मंत्री विखे म्हणाले.
खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन केले. या दोघांच्या विधानाची दखल घ्यायचे कारण नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या मुद्यावर कोण काय म्हणते, यापेक्षा राज्यातील जनतेच्या मनात फक्त महायुती आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आम्ही महायुती म्हणूनच लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.