

Ahilyanagar news : अहिल्यानगर शहरातील बाजारपेठेत महिला आणि नागरिकांवर होणारे हल्ले तसेच कथित दहशतीच्या घटनांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे.
“बाजारपेठेत नागरिकांवर पुन्हा हल्ला झाल्याची तक्रार आल्यास संबंधित पोलिसांवरच कारवाई करू,” असे विखे पाटील यांनी सांगितले.
कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आणि भाजपचे (BJP) शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
“आपल्या बोटचेपी धोरणामुळे संबंधितांचे धाडस वाढत असल्याने बाजारपेठेत महिला आणि नागरिकांवर सतत हल्ले होत आहेत. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. बाजारपेठेतील गुंडगिरी आणि दहशतीला आता थारा दिला जाणार नाही,” असा इशारा विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिला.
बाजारपेठेत सुरक्षित वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. व्यापाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहून अतिक्रमणमुक्त आणि दहशतमुक्त बाजारपेठ तसेच शहर करण्याचा संकल्प जगताप यांनी केला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
“बाजारपेठेतील गुंडगिरी आणि दहशतीला स्थानिकांनीही प्रतिकार केला पाहिजे. प्रत्येक वेळी आमदार किंवा मंत्री मदतीला धावून येतील, अशी अपेक्षा ठेवू नका. व्यापार वाढण्यासाठी आणि बाजारपेठ अधिक समृद्ध होण्यासाठी सुरक्षित वातावरण आवश्यक आहे. येणाऱ्या काळात बाजारपेठेतील दहशत आणि गुंडगिरी शंभर टक्के मोडून काढू,” असे विखे पाटील यांनी सांगितले.
कापड बाजार परिसर अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत होता. आता या परिसराच्या विकासाला गती देण्यात येत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. “बऱ्याच वर्षांपासून आहे त्याच स्थितीत असलेला कापड बाजार परिसर विकासासाठी आसुसलेला होता. मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. अतिक्रमणामुळे बाजारपेठेचे स्वरूप विद्रूप झाले आणि त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला. आमदार संग्राम जगताप यांनी याविरोधात भूमिका घेतली आहे. बाजारपेठेला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत,” असे ते म्हणाले.
आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेतील कथित दहशत आणि अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेतली. “बाजारपेठेतील दहशत आणि गुंडगिरी मोडीत काढून ही बाजारपेठ अतिक्रमणमुक्त करणार आहे. यासाठी मी ठाण मांडून येथे बसणार आहे. व्यापाऱ्यांनी फक्त साथ द्यावी,” असे जगताप म्हणाले.
महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “पुन्हा अतिक्रमण करण्याची किंवा महिलांवर हात टाकण्याची हिंमत होणार नाही, असा बंदोबस्त केला जाईल,” अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, कार्यक्रमात ईश्वर बोरा यांनी प्रास्ताविक केले. बाजारपेठेतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.