

Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची रिक्त जागा भरली जाणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे.
अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या या जागेवर आता महायुतीतच मोठी रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक केवळ एक जागा भरण्यापुरती मर्यादित राहणार नसून, ती महायुतीतील अंतर्गत ताकद मोजण्याची लढत ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
या मतदारसंघावर दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सलग दोनदा विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम ठेवला होता. मात्र, राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, त्यानंतर महायुतीची (Mahayuti) झालेली नव्याने उभारणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदललेले संख्याबळ यामुळे आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटल्यानंतर जगताप कुटुंबाने अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अरुण जगताप यांचे पुत्र तथा अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर विजय मिळवत आपली राजकीय ताकद कायम ठेवली. सध्या ते जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरे मानले जातात.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत संग्राम जगताप यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर मोठे आघात झाले. विधान परिषदेतून अरुण जगताप निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीने अचानक गंभीर वळण घेतले आणि त्यांचे निधन झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. यातून सावरण्याआधीच, त्यांचे सासरे भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाची घटना घडली. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याचे चित्र आहे.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा अहिल्यानगर जिल्हा आता बहुरंगी राजकीय स्पर्धेचे केंद्र बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपले बळ मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. उलट अजित पवार राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नसल्याने या विधान परिषद जागेवर भाजप दावा ठोकण्याची शक्यता अधिक बळावली आहे. भाजपमध्ये या जागेसाठी इच्छुकांची संख्याही मोठी असल्याची चर्चा आहे.
यामुळेच महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची धुरा सध्या सांभाळत असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जागेबाबत कोणती भूमिका घेतात, हे निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर संग्राम जगताप, आशुतोष काळे, किरण लहामटे आणि शिवाजीराव गर्जे यांसारखे स्थानिक आमदार पक्षासाठी किती आक्रमक भूमिका घेतात, यावरही बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.
दुसरीकडे भाजप आणि शिंदे शिवसेना या जागेसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे मुंबईपासून अहिल्यानगरपर्यंत या जागेसाठी मोठ्या राजकीय बैठका आणि खलबतं रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी देखील ही संधी सोडण्याच्या मनःस्थितीत नसल्याने शरद पवार गट कोणती रणनीती आखतो, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक आता केवळ एका जागेची निवडणूक राहिलेली नाही; ती महायुतीतील वर्चस्व, राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आणि बदलत्या जिल्हा राजकारणाची दिशा ठरवणारी निर्णायक रणधुमाळी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.