

BJP vs Ajit Pawar NCP Battle : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा सध्या महायुतीतील सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
या जागेवरून भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून, राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक असून, अंतिम निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
महायुतीतील जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 17 पैकी केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ती जागा कोकण विभागातील असू शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील राष्ट्रवादीची पारंपरिक मानली जाणारी जागा हातातून जाण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, या संवेदनशील विषयावर भाजप आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अद्याप मौन बाळगून आहेत.
दरम्यान, आजपासून विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, महायुतीकडून (Mahayuti) अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही शांतता असून, दोन्ही बाजूंनी अत्यंत सावध रणनीती आखली जात असल्याचे दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा बँक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही राजकीय धोका पत्करण्यास दोन्ही आघाड्या तयार नसल्याचे चित्र आहे.
अहिल्यानगरची जागा यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली होती. त्यामुळे अजित पवार गटाने या जागेवर दावा कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप हे प्रमुख इच्छुक मानले जात आहेत. याशिवाय माजी आमदार राहुल जगताप यांचेही नाव चर्चेत आहे.
राजकीय वर्तुळात आणखी एक महत्त्वाची चर्चा म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रशेखर घुले यांना या जागेबाबत शब्द दिला होता, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. दुसरीकडे, या मतदारसंघातून दिवंगत माजी आमदार अरुण जगताप हे दोन वेळा निवडून आले होते. त्यांचे पुत्र सचिन जगताप सध्या जोरदार तयारी करत असून, त्यांचे बंधू संग्राम जगताप हे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
राज्यात महायुतीची राजकीय पकड अधिक मजबूत होत असताना भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांवर आक्रमक दावा करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे वर्चस्व वाढले असून, अहिल्यानगरमध्येही भाजपने हीच रणनीती पुढे रेटल्याचे दिसत आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद दाखवत भाजपपेक्षा आपण “काकणभर सरस” असल्याचा दावा कायम ठेवला आहे.
भाजपकडून नेमका उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत असून, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन करून त्यांना माघार घेण्याची विनंती केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यामुळे भाजप पुन्हा एखादे ‘धक्कातंत्र’ वापरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीसमोर मात्र अधिक कठीण परिस्थिती असल्याचे मानले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बदललेले राजकीय गणित पाहता मविआला सक्षम उमेदवार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागू शकते. एकत्रित शिवसेनेने पूर्वी ही जागा लढवली होती. आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोणती भूमिका घेतात आणि राज्यस्तरीय नेते जागावाटपावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्ज दाखल प्रक्रियेला सुरुवात झाल्याने आता मुंबईपासून अहिल्यानगरपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये पडद्यामागील चर्चा तीव्र झाल्या असून, पुढील काही दिवसांत अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.