
BJP vs Shiv Sena : राहुरीतील तनपुरे सहकारी कारखान्याच्या निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ पॅनलने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी विकास मंडळ पॅनलचा धुव्वा उडवला. राजूभाऊ शेटे या शेतकरी पॅनलचे नेतृत्व करत होते.
तनपुरे सहकारी कारखाना निवडणुकीनिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि सहकार संस्थांच्या निवडणुका, म्हणजे लाॅटरी नव्हे, असा सूचक संदेश विखे पिता-पुत्रांनी दिल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकार चळवळीसाठी ओळखला जातो. सहकार, शेती, पाणी, जिल्हा बँक यांच्याभोवती राजकारण फिरत असतं. त्यामुळे राज्यातील जाणकार अन् स्थानिक नेते देखील अहिल्यानगरमध्ये राजकारण करताना, सहकाराच्या राजकारणाच्या मूडमध्ये असतात. राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखान्याबाबत देखील तेच दिसते. हे ओळखण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कमी पडल्याचे दिसते.
राहुरी सहकारी कारखाना कर्जात बुडला आहे. प्रशासक येण्यापूर्वी या कारखान्याची जबाबदारी माजी खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीचं कारण होतं. पण लोकसभेत सुजय विखे यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी कारखान्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. न्यायालयाच्या आदेशानंतर कारखान्याची निवडणूक झाली. बंद पडलेल्या कारखान्यासाठी चार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आले. त्यामुळे निवडणूक रंगतदार होईल, अशी स्थिती होती.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपचे सत्यजीत कदम यांनी पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी स्वतः पहिल्यांदा निवडणुकीत माघार घेतली. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील-सुजय विखे पाटील-आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विकास आघाडीने निवडणुकीत माघार घेतली. सुजय विखेंनी निवडणुकीच्या काळात अक्षरश: हाताची घडी घातली. कोणालाही पाठिंबा देण्याची भूमिका घेतली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि अरुण तनपुरे यांचा जनसेवा मंडळ पॅनल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळ पॅनल थेट आमने-सामने आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत स्वतः लक्ष घातलं. निवडणूक टप्प्यात आहे, असं स्थानिकांनी अहवाल दिला. मंत्री भरत गोगावले यांच्यावर तशी जबाबदारी सोपवण्यात आली. मंत्री गोगावले प्रत्यक्षात ग्राऊंड येणार, असे असतानाच ते त्यांना जमलं नाही. पण त्यांनी मोबाईलद्वारे मतदारांशी संवाद साधला. प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापर गेले. यातून वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला. पण तो देखील अपयशी ठरला.
विखे परिवाराचं राहुरी तालुक्यात मोठं प्रस्थ! या निवडणुकीत ते निर्णायक ठरेल असते, अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साथ देईल, असं वाटत असताना, सुजय विखेंनी हाताची घडी घालून बघ्याची भूमिका घेतली. रामभाऊ शेटे यांनी लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांचा उघड प्रचार केला होता. सुजय विखेंची ही हाताची घडी, एकनाथ शिंदेंसाठी सूचक इशारा देणारी ठरली. मर्यादा कुठपर्यंत आहेत, हे ओळखा, हे दाखवून देणारी ठरली. यातच जनसेवा मंडळ पॅनलच्या विजयानंतर पॅनलचे नेते अरुण तनपुरे यांनी अनेक बड्या नेत्यांची चांगलीच मदत झाली, हे सूचक असं विधान केले. हे विधान देखील एकनाथ शिंदे यांना बरचं काही सांगून जात.
शिवसेनेचे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी तनपुरे यांना सक्रिय मदत केली. जनसेवा मंडळाच्या हक्काच्या मतांमध्ये भर पडली. राहुरी नगरपरिषदेत अरुण तनपुरे यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात लावलेली आर्थिक शिस्त, राहुरी बाजार समितीचा केलेला कायापालट जमेची बाजू ठरली.
विधानसभा निवडणुकीत शेटे यांनी भाजपचे आमदार कर्डिले यांचे काम केले. त्यामुळे कर्डिलेंना मानणारे कार्यकर्ते उतराई होण्यासाठी, तसेच गावपातळीवरील स्थानिक राजकारणामुळे शेटेंच्या मागे उभे राहिले. परंतु कारखान्याच्या राजकारणात शेटेंचा हक्काचा मतदार नाही. त्यामुळे शेटेंच्या मताचे गणित सुरुवातीपासून जुळले नाही. त्यामुळे, त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव, तसेच तनपुरेंच्या पॅनलचा देदीप्यमान विजय सहज साध्य झाला.
या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील कारखान्याची सत्ता द्या, हंगाम सुरू करू, मी 'तुतारी'चा निष्ठावान असलो, तरी राज्यातील सहकार खातं 'घड्याळा'कडे आहे, लवकरच गोड बातमी देतो, असे सांगून खळबळ उडवून दिली. प्राजक्त तनपुरे यांचं हे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपल्याला साथ आहे, असा मेसेज देण्यात ते यशस्वी ठरले. परिणामी एकनाथ शिंदे इथं देखील मागे पडले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला पर्याय नाही म्हणून, अन् वरिष्ठांच्या जबरदस्तीच्या सूचना म्हणून विखेंनी बरोबर घेतल्याचं आता उघडपणे बोललं जाऊ लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत संगमनेर, नेवासा इथं शिवसेनेचे आमदार भाजप मंत्री विखेंच्या कुटनीतीमुळं निवडून आले. हेच एकनाथ शिंदे यांना लक्षात राहिलं नाही. तनपुरे कारखाना निवडणुकीत देखील एकनाथ शिंदेंनी विखेंना विश्वासात घेतलं नाही. परिणामी, आगामी काळात एकनाथ शिंदेंची ताकद अहिल्यानगर जिल्ह्यात 'लिमिटेड' राहणार असे आता सांगितले जाऊ लागलं आहे.
सहकार संस्थांची निवडणूक म्हणजे लाॅटरी नव्हे, असा सूचक मेसेज एकनाथ शिंदेंना या निवडणुकीनिमित्ताने गेला. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहे. मंत्री विखे आणि त्यांचे पुत्र सुजय विखेंनी अहिल्यानगर भाजप संघटनेत वर्चस्व वाढवलं आहे. भाजपच्या मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीत ते समोर आलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी विखे पिता-पुत्रांनी संघटनात्मक बांधली सुरुवात केली आहे. मंत्री विखेंनी भाजप नगरसेवकांच्या बैठका सुरू केल्या आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांनी शहरात पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव घेतला. यातून त्यांनी शहरातील महापालिकेच्या अनुषंगानं चाचपणी सुरू केली. स्वबळाची तयारी झाल्यास, शहरात शिवसेनेबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला टक्कर द्यावी लागेल, हे विखे ओळखून आहेत. त्यामुळे विखेंनी रणनीती आखण्यास सुरूवात केली. यात एकनाथ शिंदेंची शिवसेना कुठच दिसत नाही. ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत स्थानिक नगरसेवकांनी मुंबईत प्रवेश केला. त्यानंतर दोन्ही शिवसेना शहरात दिसेनाशा झाल्या आहेत. याचाच राजकीय फायदा घेण्याची तयारी विखेंनी सुरूवात केली आहे. सुजय विखेंची आमदार संग्राम जगताप यांच्याशी असलेली मैत्री सर्वश्रृत आहे. हे दोघं एकत्र आल्यास महायुतीतून अहिल्यानगर महापालिका निवडणुकीला एकनाथ शिंदेंची शिवसेना बाजूला सारायला देखील मागे-पुढे पाहणार नाहीत, असं देखील राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी संघावर निष्ठा असलेल्याची निवड करून शहरात देखील संघाची ताकद विखेंनी मिळवली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेपेक्षा काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीशी अधिक संघर्ष करावा लागणार आहे. हे विखेंनी हेरलं आहे. यात पुन्हा एकनाथ शिंदेंची शिवसेना कुठचं दिसत नाही. यामुळे तनपुरे सहकारी कारखान्याची निवडणूक एकनाथ शिंदेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सूचक, असा इशाराच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.