NCP Shirdi Shibir News : शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेष करून महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये यश मिळवण्याच्या दृष्टीने आत्ताच संघटनात्मक बांधणी करा. आपण आता पाच वर्षे सत्तेमध्ये आहोत. या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहरी चेहरा झाला पाहिजेत, हाच आपला संकल्प असेल, अशी तयारी करा. अशा सूचना अजित पवार यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या मंत्री, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केल्या.
अजित पवार(Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना तब्बल एक तासापेक्षा अधिक वेळ भाषण केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2023 नंतर वाढलेल्या ताकदीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवावा यावर भर दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना दिल्या. यात सर्वाधिक महापालिका कशा जिंकता येतील यावर भर द्या. ज्यांना आमदारकीला संधी मिळाली नाही. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती ही पहिली पायरी ओळखून तयारीला लागा, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या.
पक्षाच्या वाट्याला दहा मंत्रीपद आले आहेत. या मंत्र्यांकडे संघटनात्मक बांधणीची महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. संघटनात्मक बांधणीसाठी दोन महत्त्वपूर्ण कक्ष सुरू करत असून ते थेट आपल्या नियंत्रणात असतील. वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि वचनपूर्ती कक्ष, असे दोन कक्ष मार्चपूर्वी सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा(NCP) ग्रामीण चेहरा, अशी ओळख झाली आहे. परंतु अजितदादा पवार यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे आणि विधानसभेतील निवडणुकीतील यशामुळे मुंबईत देखील राष्ट्रवादीची ओळख निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली ताकद निर्माण केली आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईत राष्ट्रवादीचे वेगळे चित्र, असेल असा सूर पदाधिकाऱ्यांनी आवळवला होता. तोच धागा पकडत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना शहरी संघटनावर भर देण्याच्या सूचना केल्या. अजितदादांनी देखील मुंबईसह शहरी भागातील महापालिका पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
विरोधकांच्या फेक नरेटिव्हकडे दुर्लक्ष करा विरोधकांकडे कोणता मुद्दा शिल्लक नसल्याने ते फेक नरेटिव्हवर काम करत आहे. त्यामध्ये जास्त गुंतून न पडता आपल्या पक्षाच्या विचारसरणी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर काम करा. काल-आज-उद्या, हीच विचारसरणी आपल्या पक्षाची राहील. यावरच पक्ष पुढे संघटनात्मक बांधणी करेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या पडत्या काळामध्ये अनेकांनी साथ सोडली. विधानसभेत पक्ष विरोधात काम केले. पक्षाविरोधातच निवडणुका लढल्या. परंतु ते आता पडले आहेत. ते आता चुकलो चुकलो, असे म्हणत पुन्हा पक्षात घेण्याची विनंती करत आहे. पण त्यांना संधी देणार नाही. पक्षशिस्त नावाचा काही प्रकार आहे का नाही? हे पण त्यांना कळले पाहिजे. आता आपला पदर फाटला आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात संधी नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महायुतीची बांधणी करताना आम्ही पक्षप्रमुखांनी काही स्वतःला नियम घालून घेतले आहेत. त्या नियमांचा आम्ही प्राधान्यांनी विचार करणार आहोत. चुकीच्या कामांना आम्ही अजिबात पाठीशी घालणार नाही. चुकीचे काम घेऊन येणाऱ्यांना उभे करणार नाही. परंतु पक्ष वाढीचे, संघटनात्मक बांधणीचे, सरकारी धोरणात्मक काम प्राधान्याने केले जाईल, अशी भूमिका अजित पवार यांनी यावेळी शिबिरात मांडली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.