
Balasaheb Thorat press conference : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तथाकथित संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या संगमनेरमधील राजकीय कीर्तनावरून झालेल्या वादानवर पत्रकार परिषद घेत जबरा प्रतिहल्ला चढवला.
तथाकथित संग्रामबापू भंडारे महाराज यांचा बुरखा फाडलाच, पण शिवसेना आमदार अमोल खताळ यांची बौद्धिक पातळी किती, यावर थोरातांनी घणाघात केला.
संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या समर्थनात हिंदुत्ववादी (Hindu) संघटनांनी काल संगमनेर इथं मोर्चा काढला होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका केली होती. ही टीका करताना, थोरातांचा 'डीएनए' तपासला पाहिजे, असा टोला खताळांनी लगावला होता.
बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) खताळ यांच्या या टीकेला, जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'किती नीच पातळी गाठावी, 'डीएनए' काय असतं, हे तरी माहिती आहे का? कुणीतरी लिहून दिलं असेल आणि हा बोलला असेल. त्याची बौद्धिक पातळी तेवढीच आहे', असा टोला थोरातांनी खताळांना लगावला.
संग्रामबापू भंडारे महाराज यांनी कीर्तनातील हल्ल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मला सहीसलामत बाहेर काढल्याचा दावा केला. त्यावर थोरात म्हणाले, "मला तसा व्हिडिओ दाखवावा. तिथं अनेक जण होते. कुणीतरी व्हिडिओ काढलाच असेल, त्यांनी तो समोर आणावा. माझा कार्यकर्ता असेल तर, नक्की त्याला बजावेल."
बाळासाहेब थोरात म्हणाले, "संत तुकाराम महाराज यांनी कीर्तनाची काही पथ्ये सांगितली असली, तरी काळाच्या ओघात ती बदलू शकतात. जेवण करू नये, असेल तर आता ते म्हणता येणार नाही. परंतु एक पथ्य पाळलं पाहिजेत." आपण वारकरी संप्रदायमधील आहोत. त्याला आपण हरिभक्त पारायणकार म्हणतो, त्यांनी राजकारणावर जाऊ नये, स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये, कुणासाठी तरी राजकीय भाष्य करू नये, असेही थोरात यांनी म्हटले.
'कीर्तनकाराचं कुणासाठी तरी राजकीय वक्तव्य नसावं, राज्यघटनेतील जे मुलभूत तत्त्व आहे, त्याला ठेच पोचेल, असे वाक्य आपल्या कीर्तनकरांनी करू नये. देशाची राज्यघटना ही संत परंपरेतून तयार झालेली आहे, असा मानणारा मी आहे. एवढी तर पथ्य पाळली पाहिजे, दुर्दैवानं ती पाळली जात नाही, असे सध्याचं चित्र आहे', असं निरीक्षण थोरातांनी नोंदवलं.
संग्रामबापू भंडारे महाराज यांनी महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यावर हल्ले झाल्यास, त्यावर थोरातांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे म्हटले होते. यावर थोरातांनी, 'त्याला काय म्हणायचं, तो त्याचा मुद्दा आहे. जो माणूस नथुराम गोडसेचं नाव घेऊन बोलतो, तो वारकरी होऊ शकतो का? वारकरी संप्रदायची बैठक झाली. त्यांचेही म्हणणे आहे की, यात राजकारण नसावं. खरे वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार आहेत, ते सर्व जण आम्हाला त्याच्या वादात पडायचं कारण नाही, अशी भूमिका घेऊन आहेत. पण ढोंगी कीर्तनकार, बुरखा पांघरलेले कीर्तनात वेगळेच असतात.'
संग्रामबापू भंडारे महाराज यांनी राज्यघटनेच मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. कीर्तनात काय बोलायचे, काय नाही बोलायचे हे बाळासाहेबांनी मला शिकवू नये, असे म्हटले होते. त्यावर बोलताना थोरातांनी, 'याच राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वांमध्ये, कुणाला ठेच पोचले असा बोलण्याचा अधिकार दिलेला नाही, कारण अत्यंत विचारपूर्वक, देशाची दिशा ठरवणारी, प्रगती ठरवणारी, राज्यघटनेला स्मरून सर्वांनी शपथ घेतलेली असते. राज्यकर्त्यांनी देखील शपथ घेतलेली असते. राज्यघटनेवर बोलावं, एवढा अधिकार,अशा महाराजांना नक्कीच नाही. ज्यापद्धतीने ते मांडणी करत असतात, ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातील आहे. राज्यघटनेतील मुलभूत तत्वांवर त्यांनी नकारात्मक भाष्य करू नये.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.