
Congress reaction Maratha reservation : 'OBC'मधूनच आरक्षण घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. जरांगे पाटील यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मराठा समाज ऐन गणेशोत्सवात मुंबईच्या दिशेने निघाला आहे. एवढ्या दिवसांपासून जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर शांत असलेल्या भाजप महायुती सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे.
मराठा समाज विकासासाठी पुनर्गठित मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करत, जरांगे पाटील यांच्याशी चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या उपसमितीच्या नियुक्तीवरून भाजप महायुती सरकारला जरांगेंनी आंदोलन सुरू केल्यानंतर उपसमिती नेमली, तसंच समितीबाबत जास्त अनुभव कोणाला, हे सांगत समितीबाबत उशिर केल्याचा टोला लगावला.
काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर इथल्या निवासस्थानी विधिवत गणेश पूजनाने श्रींची स्थापना झाली. बाळासाहेब थोरात, पत्नी कांचन, मुलगी जयश्री यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते. गणरायाच्या स्थापनेनंतर थोरात यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, "मनोज जरांगे (Manoj Jarange) हे संघटित पद्धतीने पुढे जात आहेत. जरांगे यांचं आंदोलन यशस्वी व्हावं आणि मराठा समाजाच्या प्रत्येक घटकाला आरक्षण मिळून त्यांच्यात आनंद निर्माण व्हावा, अशी माझी गणेशा चरणी प्रार्थना आहे." जरांगे पाटलांना न्यायालयाने मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यावर थोरातांनी न्यायालयीन विषयामध्ये बोलण्यास मर्यादा आहे. मात्र आंदोलन आणि चळवळ विसरून चालणार नाही, असेही थोरातांनी सांगितले.
'मोठ्या संख्येने समाज येतो आहे, सरकारने मागण्यांना मान दिला पाहिजे. सध्याच्या सरकारकडून मराठा समाजाला अपेक्षा आहेत. त्यामुळे सरकारने हा निर्णय लवकर करावा. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आपण म्हणतो, त्यावेळी बाकी विचार करण्याचं कारण नाही. मराठा समाजातील गरिब घटकाला आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. सरकारने तातडीने आंदोलनाबाबत विचार करावा', याकडे थोरातांनी लक्ष वेधलं.
'केंद्र सरकार तुमच्या हाताशी आहे. एरव्ही काहीही निर्णय घेणारे केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ शकतं. जनतेच्या भावनेचा आदर करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला तर हा विषय आणखी सोपा होईल. मराठा आरक्षणावर कार्यवाही करत असताना, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये हे, आम्ही कायम मांडत आलोय', याकडे देखील थोरातांनी लक्ष वेधलं.
महाविकास आघाडीच्या काळात मराठा आरक्षण देण्यासाठी अपयश आलं, अस बिलकुल नाही. याबाबत त्यांना खुलासा घ्यायचा असेल तर, अशोक चव्हाण हे चांगल्या पद्धतीने खुलासा देतील. जरांगे पाटलाचं आंदोलन सुरू झाल्यावर सरकारने उपसमिती स्थापन केली. अशोक चव्हाणांना समितीबाबत जास्त अनुभवी आहेत. निर्णय चांगला व्हावा हीच अपेक्षा, असे सांगताना महायुती सरकारने उपसमिती स्थापनेचा निर्णयाला उशिर केल्याकडे थोरातांनी अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले.
'केवळ मराठा आमदारच नाही तर, सर्वांनीच याला पाठिंबा दिला पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, हे आम्हीही म्हणतोय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा ताण मुंबईवर येणार आहे, त्यामुळे सरकारने जबाबदारी घेऊन लवकर निर्णय करावा', अशी देखील अपेक्षा थोरातांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.