Rohit Pawar News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे हजेरी लावली. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्रात १५.७० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला आहे. मात्र या दाव्यांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावरच गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. ज्या कंपन्यांशी करार झाले आहेत, यातील बहुतांशी कंपन्या मुंबई, पुणे आणि ठाणे येथील आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कंपन्यांशी होणारे करार हा अनेकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे.
आमदार पवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या कंपन्यांशी गुंतवणूक करार केले आहेत. ते करार मी पाहिले. ते चांगले आहेत. त्यातील कंपन्या देखील चांगल्या आहेत. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. मात्र यातून काही प्रश्न देखील उपस्थित होतात.
ज्या कंपन्यांशी गुंतवणूक करार झाले आहेत. या कंपन्या आपल्या शेजारी आहेत. मग त्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती?. हे करार तर महाराष्ट्रात देखील करता आले असते. महाराष्ट्रात हे करार केले असते तर ते लोकांना जास्त आवडले असते, असा टोमणा त्यांनी मारला.
ज्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईत आहेत त्या कंपन्यांसाठी दावसला जाण्याची आणि तेथे करार करण्याची काय गरज होती. ज्या कंपन्यांशी करार झाला त्या कंपन्या चांगल्या आहेत. मात्र त्या करारांची अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न देखील आमदार पवार यांनी उपस्थित केला.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद सध्या दावोस येथे सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत विविध अधिकाऱ्यांसह गेले तीन दिवस तेथे आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध कंपन्यांची चर्चा करून राज्यात गुंतवणूक करण्यासाठी करार केले आहेत.
या दौऱ्यात महाराष्ट्रात १५.७० लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये रिलायन्स आणि ॲमेझॉन या कंपन्या आघाडीवर आहेत. एकट्या रिलायन्स कंपनीने विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीबाबत तीन लाख पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे करार केले आहेत. अन्य कंपन्या देखील मुंबई आणि पुणे शहराशी संबंधित आहे.
मुंबई आणि पुणे येथील कंपन्यांशी दावोस येथे जाऊन करार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संदर्भात विरोधी पक्षांना आता एक आयता मुद्दा देखील मिळाला आहे. झालेल्या करारांची किती अंमलबजावणी होते. यावर विरोधी पक्षाने यापूर्वीचा अनुभव विचारात घेऊन नेमके बोट ठेवले आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा दौरा विरोधकांसाठी राजकीय आखाडा होऊ शकतो. त्याची सुरुवात आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.