Maharashtra BJP Internal Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीचे नेते रोज नव्या घोषणा आणि संकेत देऊ लागले आहेत. यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची भूमिका चर्चेचा विषय आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लढविण्याचा चंग बांधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राज्यात विविध ठिकाणी पक्षाच्या बंद दाराआड खलबते आणि बैठका सुरू आहेत. बैठकांतून होणारी चर्चा आता बाहेर येऊ लागली आहे.
भारतीय जनता पक्षाची बैठक नुकतीच नाशिकला झाली. त्यात शतप्रतिशत भाजपसाठी पक्षाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यभरात विविध महापालिकांसाठी विविध मंत्री आणि पदाधिकाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने जो अन्य पक्षांतील नेत्यांचे जोरदार इनकमिंग घडविले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला येथे पुन्हा एकदा महायुती एकत्र निवडणुका लढवणार असे स्पष्ट केले आहे. महायुती एकत्र लढल्यास जागा वाटपाचा गंभीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषता मुंबई, पुण, नवी मुंबई, ठाणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष आपल्या प्रभाव टिकवून आहेत. उलट सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपला दुर्लक्षित करून आपल्या पक्षाचा विस्तार करण्यावर भर दिला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळावर निवडणुकीची घोषणा करणेच शिल्लक ठेवले आहे. त्यांच्या रोजच्या दौऱ्यात आणि प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. भाजप देखील येथे प्रबळ आहे.
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे दोन्ही पक्षांनी आपली ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून मुंबई महापालिकेत बहुमताच्या जवळपास आकडा गाठला होता.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आता उद्धव ठाकरे यांच्या अनेक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने एकनाथ शिंदे स्वतंत्र निवडणूक करतील असे संकेत आहेत. त्यामुळे महायुती झाल्यास मुंबई महापालिकेत अजित पवारांना किती जागा मिळतील याचे उत्तर सोपे नाही.
नाशिक महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने अन्य पक्षांतील जवळपास ३३ माजी नगरसेवकांना प्रवेश दिला आहे. हा पक्ष शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रबळ नेत्यांना रोज पक्षात येण्यासाठी पायघड्या घालत आहेत.
अनेक नेत्यांचे उंबरे झिजवत आहेत. दुसरीकडे भाजपने शतप्रतिशत भाजप अशी घोषणा केली आहे. या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन मंत्री असताना महायुतीत जागा वाटपात भाजप लहान भाऊ होण्याचे औदार्य दाखवील का?.
नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण- डोंबिवली या महापालिकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रभाव वाढविला आहे. नवी मुंबईत गणेश नाईक हे भाजपचे नेते आपला प्रभाव राखून आहेत. उपस्थितीत मुंबईशी निगडित या महापालिकांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात संघर्ष होणे अटळ आहे. हा संघर्ष गेल्या काही दिवसात वारंवार घडलं आहे. त्यात जाहीरपणे एकमेकांविरोधात वक्तव्य करण्यात आली आहेत.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रित निवडणुका लढणार, पण कशा याचे अनेकांना कोडे आहे. भाजप आपल्या सहकारी पक्षांना जागा सोडण्याचे औदार्य दाखवील का?. तसे केल्यास शतप्रतिशत भाजप या धोरणाचे आणि घोषणाचे काय होणार? याची भीती भाजपच्या इच्छुकांना वाटू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.