
Ahilyanagar Emergency Political History: पन्नास वर्षांपूर्वी सध्याचा अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. विरोधीपक्ष कमकुमत असले, तरी ते आणीबाणीच्या विरोधात असल्याने त्यावेळच्या जनसंघ, समाजवादी, कम्युनिस्ट आणि शेकापच्या पदाधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
कोपरगाव, पुणतांबे आणि शिर्डी या जनसंघाचे अस्तित्व असलेल्या गावात मीसाबंदी कायद्याखाली अटक झालेल्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक 37 एवढी होती. भाजपने आज देशासह जिल्ह्याचा राजकीयपट पुरता व्यापून टाकला. त्याची पाळेमुळे या तीन गावांत आजही कायम आहेत.
आणीबाणीच्या विरोधात सभा घेण्याची तयारी करीत असताना भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष (कै.) सूर्यभान वहाडणे यांना अटक झाली. पुणतांबे इथं त्यांचे बंधू वसंतराव आणि जगन्नाथराव यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करतात, म्हणून अटक झाली. कोपरगावातून ॲड. वसंतराव कोऱ्हाळकर, बाळासाहेब कोऱ्हाळकर, माजी खासदार (कै.) भीमराव बडदे, त्यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णराव आणि शंकरराव बडदे, वसंतराव कुलकर्णी, शिर्डीतून बाबूराव पुरोहित, सुभाष कोते, दिलीप संकलेचा, राहाता इथून किसान संघाचे चंपालालभाऊ सांड आदी प्रमुख मंडळींना मीसाबंदी कायद्याखाली अटक करण्यात आली.
(कै.) भीमराव बडदे व बाबुराव पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव (Kopargaon) इथं आणीबाणीच्या विरोधात करण्यात आलेला सत्याग्रह जिल्ह्यात गाजला होता. या शिवाय याभागातील साखर कामगारांच्या क्षेत्रात कार्यरत असलेले समाजवादी नेते जयसिंग पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली. मात्र अटक झालेल्या मंडळीत जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींची संख्या मोठी होती.
पुणतांबे हे त्याकाळी वहाडणे बंधूंमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाई. कोपरगावात पिढ्यान पिढ्या संघाचे काम करणारी मंडळी होती. पुढे (कै.) सूर्यभान वहाडणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कातून शिर्डी राष्ट्रीय स्वयंसवेक संघ आणि जनसंघाचा प्रभाव असलेले गाव म्हणून ओळखले जाऊ लागले.
या मंडळींनी एका निवडणुकीत ग्रामपंचायतीवर जनसंघाचा झेंडा फडकावून राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्याकाळातले काँग्रेस विरोधी विचारसरणीचे हे कार्यकर्ते आणि नेते तुरुंगात गेले. पुढे जनता पक्षाचा अल्पकाळ वगळता काँग्रेस प्रदीर्घ काळ सत्तेत राहिला. मात्र या मंडळींनी विचारसरणी सोबत जोडलेली नाळ मात्र कधीही तोडली नाही.
पुढे जनसंघाचे रूपांतर भाजपमध्ये झाले. (कै.) सूर्यभान पाटील वहाडणे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्याच कार्यकाळात भाजप शिवसेना युतीचे सरकार राज्यात पहिल्यांदा सत्तारूढ झाले. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते या युतीचे देखील शिल्पकार राहिले. पुढे (कै.) गोपीनाथ मुंडे यांचे महाविद्यालयीन काळातील सहकारी असलेले लढाऊ बाण्याचे नेते भीमराव बडदे कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून लोकसभेत गेले. भाजप राज्यभर विस्तारला त्याची पाळेमुळे कोपरगाव, पुणतांबा आणि शिर्डीत आजही सापडतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.