
Jalgaon Politics : अजित पवार यांच्या खेळीने जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणं पूर्णता बदलली आहे. शरद पवार गटाचे दोन माजी माजी मंत्री गुलाबराव देवकर व सतीश पाटील यांना अजित पवार यांनी गळाला लावलं आहे. त्यासोबतच दोन माजी आमदार व अनेक पदाधिकारी अजित पवार गटात आल्याने जिल्ह्यातील अजित पवार गटाची ताकद वाढली आहे. सुरुवातील स्थानिक पदाधिकारी व नेत्यांचा या सगळ्यांच्या प्रवेशाला विरोध होता. मात्र अजित पवारांनी सर्वांना विश्वासात घेऊन या सगळ्यांचा प्रवेश घडवून आणला.
या सगळ्यांच्या पक्षप्रवेशासाठी माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जातं. आपल्या अमळनेर मतदारसंघातही ते प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांना आकर्षित करत आहेत. यात माजी मंत्री सतीश पाटील यांचाही पक्षप्रवेश अनिल पाटील यांना विश्वासात घेऊनच झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
अंमळनेर आणि एरंडोळ-पारोळा हे दोन्ही मतदारसंघ जवळ जवळ असूनही दोघांमध्ये वाद आहेत. अनेकदा दोघांनी एकमेकांवर टोकाची टीका केलेली महाराष्ट्राने पाहिले आहे. आता याच अनिल भाईदास पाटील यांनी सतीश पाटील यांना राष्ट्रवादीत आणले आहे. या मागे नेमका काय उद्देश असावा अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे.
अनिल भाईदास पाटील मागच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, मात्र आता त्यांच्याकडे फक्त आमदारकी आहे. अशात माजी मंत्री असलेले सतीश पाटील पक्षात येत असल्याने कुठेतरी असुरक्षितता असते. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा पक्ष प्रवेश झाल्याचे सांगितले जात आहे. माजी मंत्री सतीश पाटील हे अजित पवार गटात आले. यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे.
त्याचा निश्चितच अजित पवार गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे. तसेच आगामी पालिका निवडणूक आणि जिल्हा बँक निवडणुकीत आपल्या पदरात काहीतरी पाडून घेण्याच्या दृष्टीने सतीश पाटील यांनीही अनिल पाटील यांच्याशी नमते घेतल्याचे चित्र आहे.
अमळनेर मतदारसंघ वगळता अजित पवार गटाचे जिल्ह्यात प्राबल्य नाही. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी या सगळ्यांना सोबत घेण्यासाठी अजित पवारांनीच कंबर कसली. एरंडोळ, पारोळा, पाचोरा भडगाव, चोपडा आणि एकूणच जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेची ताकद आहे. ही ताकद कमी करण्यासाठी आणि राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी अजित पवार यांनी अनिल पाटील यांची समजूत घातल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा अजित पवार व शरद पवार यांचे दोन पक्ष वेगवेगळे झाले. त्याचवेळी सतीश पाटील यांना अजित पवार यांचं बोलावणं होतं. स्वत: अनिल पाटील तसा निरोप घेऊन आल्याचा दावा सतीश पाटील यांनी केला होता. पण त्यावेळी सतीश पाटील यांनी आपल्याला शरद पवार साहेबांना सोडायचं नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र त्याच सतीश पाटील यांना आता सत्ता खुणावू लागल्याने त्यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. अनिल पाटील यांच्याशीही जुळवून घेतलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.