Jalgaon News, 21 Jan : महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीपासून 'ईव्हीएम'मध्ये घोळ असल्याचे आरोप झाले नाहीत अशी एकही निवडणूक पार पडलेली नाही. प्रत्येक निवडणुकीत विरोधकांसह काही अपक्ष उमेदवारांकडून ईव्हीएम'मध्ये काहीतरी गडबड असल्याचा आणि ती सेट केल्याचा आरोप केला जातो.
मात्र, विरोधकांचे हे आरोप नेहमीप्रमाणे निवडणूक आयोग फेटाळून लावतो. अशातच आता नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील EVM मध्ये घोटाळा केल्याचा आरोप एका अपक्ष उमेदवाराने केल्याची पोस्ट व्हायरल होत आहे.
या उमेदवाराच्या नावाने व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये त्या उमेदवाराला स्वत:चं मतदान देखील न मिळाल्याचा दावा केला आहे. मला माझंच एकही मत कसं मिळालं नाही? असा सवाल या उमेदवाराने उपस्थित केलाय. या आरोपांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे यांनी EVM वर आक्षेप घेतला आहे.
या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये म्हटलंय की, 'माझ्या घरातल्या लोकांचे मत जाऊ द्या, पण माझं स्वतःचं मत तर मी मला दिलं होतं, मग ते मत कुठे गेलं? 'आता या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं? मत EVM मध्ये गेलं कि निकाल भाजपला गेला आणि प्रश्न विचारला की निवडणूक आयोग शांत. उत्तर मात्र भाजपकडून येतं. म्हणजे, EVM सरकारी, निवडणूक आयोग घटनात्मक, पण स्पष्टीकरण मात्र पक्षीय. आजची लोकशाही अशी झालीय की, बटन मतदार दाबतो. निकाल मशीन ठरवतं आणि खुलासा पक्ष देतो.
फेगडे बाईंचा प्रश्न साधा आहे, मी मला मत दिलं होतं ते मत दिसत नाही. पण आयोग म्हणतो, EVM सुरक्षित आहे. भाजप म्हणतो, जनतेचा कौल आहे. मग प्रश्न असा पडतो, फेगडे बाईंचं मत अवैध होतं का? की मतदाराचाच कौल आता गरजेचा उरलाय नाही? आज EVM वर प्रश्न विचारणं म्हणजे लोकशाहीवरच संशय घ्यायचा गुन्हा झाला आहे.'
तर सुनंदा फेगडे या जळगावात प्रभाग क्रमांक एक मध्ये अ गटातून निवडणूक लढवत होत्या. मतमोजणीत त्यांना एकही मत पडलं नसल्याने त्यांनी आक्षेप ईव्हीएमवर घेतला. मी मला मत दिलं तरी ते दिसत नाही आणि निवडणूक आयोग ईव्हीएम सुरक्षित असल्याचं सांगतं आहे. तर भाजप जनतेचा कौल असल्याचं म्हणतंय. पण मतदारांचा कौल गरजेचा आहे का? ईव्हीएमवर प्रश्न म्हणजे लोकशाहीवरच संशय घ्यायचा गुन्हा झालाय असं फेगडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुनंदा फेगडे यांच्या नावासमोर शून्य मतं दिसत असल्यामुळे त्यांनी आपले स्वत:चे मत कुठे गेले, असा सवाल उपस्थित केला होता. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मतांची आकडेवारी ही पोस्टल मतांची असून सुनंदा फेगडे यांना शून्य पोस्टल मतं मिळाली होती. तर ईव्हीएम मतदानात त्यांना 92 मतं मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.