
Manikrao Kokate : विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सुरु असताना रमी गेम खेळत असल्याच्या व्हिडीओमुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. त्यावर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यासंदर्भात पत्रकारपरिषदेत घेत कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं.. मी रमी गेम खेळत नव्हतो, तो गेम मला खेळताच येत नाही. मी फक्त जाहीरात स्कीप करत होतो त्यावेळचा तो व्हिडीओ असल्याचं कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे. राजीनामा द्यायला मी असं केलं तरी काय आहे, मी काय कुणाचा विनयभंग केला का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.
पण यादरम्यान एक घोळ निस्तरताना कोकाटे दुसरा घोळ घालून बसले आहेत. त्याचं झालं असं की, कोकाटे यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं. त्यांनी सरकार भिकारी आहे अशा आशयाचे विधान केले आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही फडणवीस यांनी रमी गेम खेळण्याच्या प्रकारावरुन त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. अशा प्रकारे सभागृहात गेम खेळणं भूषणावह नाही असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांनी कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त करण्याची ही दुसरी वेळ आहे.
कोकाटे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. म्हणजेच भिकारी कोण आहे? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही. पण, त्याचा अर्थ उलटा केला. असं विधान कोकाटे यांनी केल्याने त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांची नाराजी ओढावून घेतली आहे. फडणवीस यांनी कोकाटे यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे गडचिरोली च्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना कोकाटे यांच्या या विधानावर विचारलं. त्यावर फडणवीस म्हणाले, कोकाटे नेमकं काय म्हणाले आहेत मी ते ऐकलेलं नाही. तरीही त्यांनी जर असं वक्तव्य केलं असेल तर एखाद्या मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. असं मत फडणवीसांनी मांडलं. पिकविम्याबाबत अतिशय चुकीची माहिती पसरवली गेली आहे असं फडणवीस म्हणाले.
पिकविम्यासंदर्भात आपण काही चांगले निर्णय घेतले आहेत. पिकविम्याच्या आधीच्या पद्धतीत शेतकऱ्यांचा फायदा होत होता. मात्र शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा हा विमा कंपन्यांना होत होता. त्यामुळे आम्ही पीकविम्याचे पद्धत बदलण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला. पीकविम्याची ही पद्धत बदलत असताना आपण शेतकऱ्यांना मदत तर करूच तसेच पाच हजार कोटी रुपये आपण दरवर्षी शेतीमध्ये गुंतवू. पाच वर्षात २५ हजार कोटींची गुतंवणूक होईल त्याचा मोठा फायदा कृषी क्षेत्राला होईल. त्याची यावर्षीपासून अंमलबजावणी चालू झाली आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली.
कोकाटे नेमकं काय म्हणाले ?
कोकाटे यांनी यापूर्वी भिकारी सुद्दा एक रुपया घेत नाही , आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो असं विधान केलं होतं. त्यावर आज झालेल्या पत्रकारपरिषेद त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं. शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही. पण, त्याचा अर्थ उलटा घेतला गेला. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि त्या पिक विम्यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज सापडले. ते माझ्याच काळात सापडले आहेत. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. आतापर्यंत कमीत कमी 52 जीआर निघाले, इतक्या घोषणा मी केलेल्या आहेत असं कोकाटे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.