Manikrao kokate News: नाशिक सह राज्यातील चार जिल्हा बँका अडचणीत आहेत. त्या बँकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज वसुली हा एकमेव पर्याय आहे. यासंदर्भात विविध तज्ञांनी हा मार्ग सांगितला. मात्र आता बँकेला वेगळ्याच मार्गाने नेण्याचा प्रयत्न होत आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात आगामी तीन महिन्यांसाठी बँकेच्या थकबाकी वसुलीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे गेल्या महिनाभरात जिल्हा बँक, सहकार आणि जिल्हाधिकारी प्रशासनाने निर्माण केलेला कर्ज वसुलीचा दबाव संपुष्टात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत बैठक झाली होती. नाशिकच्या दौऱ्यात देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. त्यात कठोर कारवाई करून थकबाकी वसुली करणे हा आदेश देण्यात आला होता. सहकार आयुक्त प्रवीण दराडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही याच सूचना देण्यात आल्या. त्यामुळे बँक आणि सहकार प्रशासनाने कर्ज वसुलीवर भर दिला होता.
कृषिमंत्री कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीने आजवर झालेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. आम्ही तीन महिन्यात बँकेला किती निधी उपलब्ध होऊ शकतो हा गंभीर प्रश्न आहे. प्रतिनिधींनी प्रत्येकी पाच लाख रुपये ठेवी ठेवल्या तरीही फार तर एक दोन कोटी रुपये संकलित होऊ शकतात. कृषी विभागाच्या योजनांचे अनुदान बँकेमार्फत दिल्यास त्याने रोखता वाढू शकते. मात्र बँकेची आर्थिक हलाखीची स्थिती कशी सुधारणार? हे अनुत्तरीत आहे.
जिल्हा बँकेकडे जवळपास दोन लाख ग्राहकांच्या दोन हजार कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवींवर व्याज देण्यासाठीही बँकेकडे पैसे नाहीत. अशा स्थितीत थकबाकी वसुली हा एकमेव पर्याय आहे. दोन हजार २०० कोटींची थकबाकी आहे. सध्या द्राक्ष आणि अन्य बागायती पिकांचा हंगाम सुरू आहे. हा वसुलीचा हंगाम म्हणता येईल. त्यातच वसुलीला स्थगिती दिल्याने बँकेची स्थिती बिघडणार आहे.
जिल्हा बँकेला आर्थिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी किमान सातशे कोटींची गरज आहे. हा निधी उपलब्ध झाला तरच बँक सुरळीत चालू शकेल. राज्यात सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेल्या पुणे जिल्हा बँकेसह राज्य सहकारी बँकेचा कारभार उपमुख्यमंत्री पवार प्रदीर्घकाळ पहात आहेत. त्यांनी कठोर वसुली हा एकमेव मार्ग बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सांगितला होता. मंत्री कोकाटे यांनी त्यातून यु टर्न घेतला आहे. अरे खरोखर जिल्ह्यातील नेते आणि मंत्र्यांना बँक वाचवायचे आहे की, तिला वेगळ्याच दिशेने न्यायचे आहे असा प्रश्न पडतो.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, खासदार सर्वश्री राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, डॉ. शोभा बच्छाव, आमदार नितीन पवार, डॉ. राहुल आहेर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलद शर्मा यांसह विविध नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर आता पुढे काय? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. त्याचे उत्तर आगामी काळात राजकीय नेत्यांच्या भूमिकेतूनच स्पष्ट होईल.
-----
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.