सिन्नर : केवळ (Sinner) नगरपालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन मतदानासाठी या गोरगरीब जनतेची दिशाभूल (Poor People) करण्याचा प्रयत्न होत आहे. जनआक्रोश मेळाव्याद्वारे अतिक्रमणधारकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) करीत आहेत, असा आरोप खुद्द आमदारांचे बंधू भारत कोकाटे (Bharat Kokate) यांनी केला आहे. (Brother & political opponent Bharat kokate criticise MLA Manikrao Kokate)
गायरान जमिनींवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम राज्यभर सुरु आहेत. त्याची झळ सिन्नर शहरातील विविध अतिक्रमणधारकांना बसली आहे. त्याबाबत त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांच्या मेळाव्यात कोकाटे यांनी अतिक्रमण पाडू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावरून राजकारण सुरु झाले आहे.
शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. त्या वेळी सोमठाणे गावाचे सरपंच भारत कोकाटे यांनी आमदार कोकाटे यांच्यावर निशाणा साधला.
ते म्हणाले, की सोमठाणे गावात गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी होतकरू, गोरगरीब जनतेची अतिक्रमणे काढून तेथील लोकांना न्याय दिला नाही. एक-दोन दिवसांपूर्वी सिन्नर शहरात जनआक्रोश मेळावा घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा जनआक्रोश मेळावा घेतला आहे.
आमदार कोकाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दडपशाहीने सोमठाणे, मेंढी, सांगवी रोडवरील चार घरकुले, २३ टपरीधारकांसह ३६ अतिक्रमण काढली. यात जलवाहिनींची तोडफोड झाली. पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी सदस्य स्वखर्चातून जलवाहिनींची दुरुस्ती करत आहेत. मात्र त्या पुन्हा तोडण्यात येत असून, पाणी असूनही पुरेसे पाणी देता येत नसल्याची खंत यावेळी सरपंच कोकाटे यांनी व्यक्त केली. एकीकडे अतिक्रमणधारकांबाबत कळवळा दाखवायचा आणि दुसरीकडे दडपशाहीने अतिक्रमण काढायची, अशी एकाच तालुक्यात ही दुटप्पी भूमिका असल्याचे सरपंच कोकाटे यांनी आमदार कोकाटे यांच्यावर निशाणा साधत म्हटले.
गावात अनेकदा विविध कारणांमुळे अतिक्रमणांचा मुद्दा पुढे करत मालमत्तांवर कारवाई केली जात आहे. अनेकांना नोटीस बजावण्यात येत आहेत. घरकुलातील रहिवासी रस्त्यावर आले आहेत. ज्या रस्त्यांच्या रुंदी करण्यासाठी अतिक्रमणे काढण्यात आली तो रस्ता अद्याप तसाच पडून आहे. त्यावर फक्त मुरूम टाकला गेल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांत अनेक वाहनधारकांचे अपघात झाले, तेव्हा गावातील लोकांसाठी तुम्ही का पुढे आले नाही, असा सवालही सरपंच भारत कोकाटे यांनी उपस्थित केला.
शहरातील अतिक्रमणधारकांविषयी आम्हाला निश्चितच सहानभूती आहे, मात्र केवळ काही दिवसांत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जनआक्रोश मेळावा घेऊन केवळ दिखावा होत असल्याचे सरपंच कोकाटे म्हणाले. शहरातील अतिक्रमणधारकांसाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शहरातील अतिक्रमणधारकांचे गाऱ्हाणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी मंचावर शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण गडाख, अरुण कोकाटे, नवनाथ धोक्रट, बबन पोमनर, सरपंच अरुण वाघ, शिवसेना कार्यालयप्रमुख पिराजी पवार उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.