
Muslim community agitation Ahilyanagar : धार्मिक स्थळाच्या विटंबनेवरून अहिल्यानगर शहरातील सकल मुस्लिम समाज आज चांगलाच आक्रमक झाला. पोलिस अधीक्षक कार्यालयावर विराट मोर्चानं जात तिथं भावनांना बांध मोकळा करून दिला. धार्मिक स्थळाची विटंबना झाल्यानंतर हा मोर्चा निघणार, अशी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर शहरातील पोलिस बंदोबस्तात आणखी वाढ केली होती.
पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा पोचल्यानंतर तिथं मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने सोमनाथ घार्गे यांच्याशी चर्चा केली. या विटंबनेप्रकरणी तीन दिवसांत सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोचून कारवाई करू, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांना दिल्याचे मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले.
अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी मैदानातील धार्मिक स्थळ जेसीबी लावून पहाटे पाडण्यात आले. यानंतर मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाला. पाडलेल्या धर्मस्थळी सकाळी मोठी गर्दी केली होती. यानंतर पोलिसांनी (Police) शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. SRPFच्या दोन तुकड्या अन् शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त मैदानात उतरवला होता. याचवेळी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मोर्चासाठी मुस्लिम (Muslim) समाज कोठला इथं जमा झाला होता. या मोर्चात युवक आणि तरुणांची मोठी गर्दी होती. मोर्चा कोठलाहून पोलिस अधीक्षक कार्यालयावर पोचला. मोर्चात मुस्लिम युवकांची आणि तरुणांची मोठी गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
मोर्चातील मुस्लिम युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'तेरा मेरा रिश्ता क्या, ला इलाहा इल्लल्लाह', ही घोषणा लक्षवेधी ठरली. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पोर्चमध्ये आल्यावर इथं मोर्चकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चातील प्रमुखांनी समोर येत शांततेचं आवाहन केलं. त्यानंतर घोषणाबाजी बंद झाली. पोलिस अधीक्षक कार्यालय गर्दीनं जाम झालं होतं. यानंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मोर्चातील शिष्टमंडळाशी चर्चा केली.
मोर्चातील प्रमुखांनी पोलिस अधीक्षकांशी संवाद साधताना, मुस्लिम धार्मिक स्थळांविषयीच वाद का निर्माण केला जात आहे, त्यात लवकर कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधले. आता देखील धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करण्यामागे वेगळाच सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करताना, यंत्रणेचा कुठतरी गैरवापर झाल्याचा देखील संशय मुस्लिम मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यात तत्काळ कारवाई केली आहे. तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिली. पुढील कारवाई सुरू असून, यात कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासन दिले. तसंच पोलिस अधीक्षकांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद, असे दोन्ही सण एकत्र आल्यानं शांतता आणि एकोप्याचं वातावरण शहरात ठेवण्याचं आवाहन केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.