

Sangamner politics : काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललं आहे, याची चर्चा असतानाच, नाशिक पदवीधरचे आमदार तथा थोरातांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिलं आहे.
संगमनेर नगरपालिकेतील नगराध्यक्षा त्यांच्या पत्नी मैथितील तांबे, आई दुर्गा तांबे यांच्यासह नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर शेअर केल्यानंतर राजकीय चर्चांना तोंड फुटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. याचवेळी आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) संगमनेर नगरपालिकेतील नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांना घेऊन विधिमंडळात दाखल झाले. तिथं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत, मुख्यमंत्र्यांनी सर्व नगरसेवकांशी संवाद साधला.
आमदार सत्यजीत तांबे यांनी साधलेल्या या टायमिंगने पुन्हा संगमनेरसह राज्यात चर्चांना राजकीय तोंड फोडलं. नाशिक (Nashik) पदवधीर निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीचा राजकीय पट पुन्हा चर्चेत आणला आहे. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस सोडून अपक्ष निवडणूक लढली. भाजपने देखील उमेदवार दिला नाही. यामुळे सत्यजीत तांबेंना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बळ असल्याची चर्चा होती.
नाशिक पदवीधरचे निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात सत्यजीत तांबे यांनी लढली अन् विजय देखील मिळवला. यानंतर विधानसभा निवडणुकीत, संगमनेर मतदारसंघात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसला. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत संगमनेर नगरपालिकेत थोरात अन् तांबे यांनी वेगळी रणनीती आखली.
स्वातंत्रसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचं सिंह हे चिन्हं घेऊन, नगरपालिका निवडणूक लढली. सत्यजीत तांबे यांनी एकहाती रणनीती राबवत, नगरपालिका निवडणुकीत यश खेचून आणलं. थोरातांना देखील बळ मिळालं. या सर्व राजकीय घडामोडी संगमनेर होत असताना, तांबे अन् थोरात कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ असल्याची चर्चा होते.
यात सत्यजीत तांबे हे मुख्यमंत्र्यांच्या 'गुड बुक'मध्ये आहेत. सत्यजीत तांबे यांच्या राजकीय निर्णयात, कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा सल्ला असतो, असे सांगितले जाते. आता संगमनेर नगरपालिकेतील नगराध्यक्षा मैथिली तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह सर्व नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांशी घडवून आणलेली भेट आणि त्यासाठी तांबे यांनी घेतलेला पुढाकार, तांबेंच्या या पुढाकाराला मुख्यमंत्र्यांनी या सर्व नगरसेवकांना भेट देत, दिलेला वेळ, यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यातूनच सत्यजीत तांबे पुन्हा सत्तेच्या दिशेने असल्याची चर्चांना जोर पकडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर, सत्यती तांबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार सूत्रांना केंद्रस्थानी ठेवून मांडला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, अजितदादांच स्मारक, जगात गेमिंग क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल होण्यासाठी गेमिंग स्टुडिओ भरण्याची तयारी आणि प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म लघु केंद्र स्थापन केले जातील, या अर्थसंकल्पातील सकारात्मक बाबी नक्कीच उल्लेखनीय आहेत. मात्र उत्तर महाराष्ट्रासाठी हा अर्थसंकल्प खूपच निराशाजनक ठरला. उत्तर महाराष्ट्रला न्याय मिळेल, अशी कोणतीच तरतूद ही या अर्थसंकल्पात नाही, याची मला खंत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.