

Prajakta Tanpure Rahuri Bypoll : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज न भरण्याचा जाहीर केल्यानंतर, ते त्यांची ताकद त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी, भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यामागे ताकद उभी करणार का? या प्रश्नानं राहुरीत जोर धरला आहे. राहुरीमध्ये तनपुरेंची ताकद मोठी आहे. तसंच तनपुरे पहिल्यापासून हे दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळ राहिले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे गोविंद मोकाटे यांनी निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केला असून, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सक्रिय आहेत. तनपुरे निवडणूक लढवत नसतील, तर ते त्यांची ताकद कोणामागे उभी करणार, असा प्रश्न चर्चेत आला आहे. विशेष करून तनपुरेंच्या कार्यकर्त्यांची अवस्था संभ्रमात आहे.
प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) आणि त्यांचे कुटुंब हे शरद पवार यांच्या नेहमी जवळचे राहिले आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर देखील तनपुरे कुटुंब पवारांशी जवळ राहिले. यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष नेते जयंत पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांचे मामा-भाचे असं नातं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात, शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील दिग्गज नेत्यांना डावलून, नवखे प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपदावर संधी दिली. राष्ट्रवादी फुटीनंतर प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांबरोबर राहिले. पण तनपुरेंचा ओढा हा अजितदादांकडे होता. तनपुरे हे शरद पवारांबरोबर राहावेत, यामागील भूमिका ही त्यांचे मामा जयंत पाटील यांची होती, असेही सांगितले जाते.
तनपुरे कारखाना निवडणुकीत, तनपुरे कुटुंबीयांनी विरोधकांचा धुव्वा उडवून, ताकद दाखवली. प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांनी लगेचच अजितदादांच्या उपस्थित शेतकरी मेळावा घेत, आपण अजितदादांबरोबर आहोत, हे दाखवून दिले. अजितदादांनी त्यावेळी तनपुरे वाड्यावर जात तनपुरे कुटुंबांसमवेत जेवण केलं होतं. यावेळी तनपुरे कुटुंबांसमवेत बरीच राजकीय समीकरणांवर चर्चा झाली होती. त्यावेळी प्राजक्त तनपुरे देखील उपस्थित होते.
नगरपालिका निवडणुकीत पुन्हा बाजी मारत, तनपुरेंनी राहुरीवर वर्चस्व दाखवलं. पुढे मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. पुढे अजित पवार यांच्या अपघाती निधनानं, तनपुरेंची त्यांच्याबरोबर ठरलेली राजकीय गणितं अधांतरीच राहिली. तेव्हापासून तनपुरे हे पर्याय शोधात आहेत.
राहुरी मतदारसंघात हिंदुत्वाचं कार्ड चालेल, अशी तनपुरेंची धारणा होती. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वावर स्वार झाले. गळ्यात भगवा पंचा आणि डोक्यावर भगवी टोपी घेतली. मतदारसंघात सक्रिय होताना, आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे सांगत होते. अगदी कालपर्यंत प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारीवर ठाम होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अक्षय कर्डिले यांचा अर्ज भरण्यापूर्वी तनपुरेंची त्यांच्याच कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर तनपुरेंनी काही वेळातच निवडणुकीसाठी अर्ज न भरण्याचा निर्णय जाहीर केला. तनपुरेंना नेमकं कोणतं आश्वासन या बैठकीत मिळालं याची आता चर्चा सुरू झाली आहे.
याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईनंतर तनपुरेंनी निवडणूक न लढण्याचा घेतलेला निर्णय, त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या पचनी पडली नसल्याची चर्चा आहे. राहुरी हा तनपुरेंचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी तेवढाच तो राष्ट्रवादीचा किल्ला असल्याचं मानलं जातं.
तनपुरेंनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय आणि त्यानंतर कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय होणार? तसं भाजप नेतृत्व तनपुरेंकडून करून घेणार का? अशा एक ना अनेक चर्चांना मतदारसंघात तोंड फुटलं आहे. तनपुरे या सर्व गोष्टी कसं उत्तर देतात याकडे देखील लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.