

Rahuri Election News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय राखत, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
निवडणूक (Election) कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना या वेळी टपाल मतदानाऐवजी 'निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र' देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. या नव्या फॅक्टरची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. टपाल मतदानाची सुविधा केवळ 'होम वोटिंग' आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं.
राहुरी (Rahuri) विधानसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी घेतली. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या सुधारित नियमांनुसार सर्व निवडणूक निरीक्षक मतदान केंद्रावर लवकर दाखल होतील. त्यामुळे सर्व नोडल अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रे व खर्चाबाबतचा सर्व डेटा तातडीने अद्ययावत ठेवावा." आयकर आणि जीएसटी विभागाकडूनही आवश्यक माहिती त्वरित संकलित करण्याच्या सूचना दिल्या.
निवडणूक प्रक्रियेतील बदलांची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले , यावेळी मतदान प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, मतदान पथके थेट मतदान केंद्रांवर पोहोचतील. सेक्टर अधिकाऱ्यांमार्फत ईव्हीएम मशिन्स पोहोचवली जातील. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक प्रशिक्षणात 'प्री-टेस्ट' व 'पोस्ट-टेस्ट' अनिवार्य करण्यात आली असून, सूक्ष्म नियोजन करून ही सत्रे घेण्याच्या सूचना दिल्या.
राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण 374 मतदान केंद्रे असून 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी टपाल मतदानाऐवजी 'निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र' दिले जाईल. टपाल मतदानाची सुविधा केवळ 'होम वोटिंग' आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता सर्व मतदान केंद्रांवर 'किमान आवश्यक सुविधा' अंतर्गत उन्हापासून संरक्षण, पिण्याचे पाणी, रॅम्प व स्वच्छतागृहांची चोख व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी भरारी पथक , स्थिर सर्वेक्षण पथक व व्हिडिओ पाहणी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.