

Sand contractor clash Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर गावात सरकारी वाळू लिलावावरून बुधवारी मोठा संघर्ष उफाळून आला.
वाळू वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्याच्या कामाला विरोध करण्यासाठी नदीपात्राकडे धाव घेतलेल्या 60 ते 70 महिलांवर ठेकेदार समर्थकांकडून कथित दगडफेक करण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप उसळला असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील रामपूर गावातील ग्रामस्थ आणि महिलांनी सरकारी वाळू लिलावाला तीव्र विरोध सुरू ठेवला आहे. शहावली बाबा दर्गाहसमोर साखळी उपोषण, आंदोलने आणि प्रशासनाला लेखी इशारे देऊनही शासनाने नियमानुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण केली होती. मुंबईतील एका कंपनीला वाळू उपशाचा ठेका मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवर हालचाली वाढल्या होत्या.
दोन महिन्यांच्या शांततेनंतर ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राकडे जाणारा रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच गावातील महिला (Women) थेट गोदावरी पात्राकडे धावल्या आणि काम बंद करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले. या वेळी वातावरण अचानक तापले.
महिलांचा आरोप आहे की, ठेकेदार समर्थकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. घाबरलेल्या महिलांनी झाडांचा आसरा घेत गावात संपर्क साधला. काही वेळातच शंभर ते सव्वाशे तरुण नदीपात्राकडे पोहोचल्याने मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण धनवडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत ठेकेदाराकडील एका चालकाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले असून, त्याची सखोल तपासणी सुरू आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्पष्ट केले.
रामपूर गावात व्यावसायिक वाळू उपशाला विरोध करण्यामागे पर्यावरण आणि पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावचे सरपंच नितीन शिंदे यांनी सांगितले की, “रामपूरमध्ये वाळू व्यावसायिकांना देण्याची परंपरा नाही. गावात बांधकामासाठी लागणारी वाळूही गाढवावरून आणली जाते; मात्र नदीतील वाळू उपसा करू दिला जात नाही.” त्यांच्या मते, “गेल्या शंभर वर्षांपासून जपलेल्या या परंपरेमुळेच दुष्काळी परिस्थितीतही गावात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. वाळू उपशामुळे शेती, पाझर तलाव, सिंचन व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.”
ग्रामस्थांनी सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्याकडेही धाव घेतली होती. महाराजांनी गावकऱ्यांच्या बाजूने जिल्हाधिकारी आणि काही मंत्र्यांशी संपर्क साधून वाळू उपसा थांबवण्याची मागणी केल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून, दोन्ही पक्षांना आज तहसील कार्यालयात बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठकीनंतर प्रशासन पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिली. रामपूरमधील वाळू संघर्षामुळे आता पर्यावरण विरुद्ध महसूल, ग्रामस्थ विरुद्ध प्रशासन आणि स्थानिक भावना विरुद्ध सरकारी प्रक्रिया असा मोठा वाद उभा राहिला आहे. आगामी बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.