Sanjay Raut News: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात 'ईडी' बाबत धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. एजंटांच्या माध्यमातून आणि भाजपच्या नेत्यांच्या सहकार्याने झालेल्या गैरव्यवहाराची चिरफाड खासदार राऊत यांनी केली. त्याबाबत त्यांनी खळबळ जनक दावे केले आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. हे सबंध बनावट प्रकरण दिल्लीच्या इशाऱ्यावरून तयार करण्यात आले. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक खोटी कागदपत्रे सादर केली. ईडीच्या गैरव्यवहाराबाबत पत्रकार परिषद घेतल्याने हे घडले असावे, असा श्री. राऊत यांचा दावा आहे.
त्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सप्रमाण पत्र लिहिले होते. त्याचा तपशील या पुस्तकात सविस्तर देण्यात आला आहे. काळा पैसा आणि हवाला व्यवहार नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेली 'ईडी'ची यंत्रणा स्वतःच काळा पैसा व हवालाचा भाग झाले, असा धक्कादायक खुलासा श्री. राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी पुस्तकात पान क्रमांक ५९ वर त्याचा तपशील दिला आहे. जितेंद्र नवलानी हा केंद्रीय तपास यंत्रणांचा मुंबईतील एजंट होता. भाजपचे काही प्रमुख नेतेही त्यात सहभागी होते. श्री. नवलानी यांच्या माध्यमातून 'ईडी'चे अधिकारी खंडणीचे रॅकेट चालवत होते, असा दावा श्री. राऊत यांनी केला.
'ईडी'चे अधिकारी बिल्डर्स, कार्पोरेट कंपन्या, ज्वेलर्स आणि शेअर दलाल यांना धमकावून कोट्यावधीची खंडणी वसुली करीत होते. 'ईडी'ने नोटीस पाठवली की नवलानी हा संबंधितांसाठी मध्यस्थी करीत होता. त्यातून जमा झालेला पैसा थेट नवलानी याच्या कंपन्यांच्या खात्यात जमा होत होता. हा पैसा गैरव्यवहारासाठी वापरला जात होता.
याबाबत श्री. राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली होती. राज्य शासनाच्या 'आयबी' विभागाने याबाबतचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाला पाठवला. मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांनी काहीही चौकशी केली नाही. या संस्था प्रचंड दबावाखाली काम करीत होत्या.
या सर्व वसुली आणि खंडणीतून आलेला दोन नंबरचा पैसा संपत्ती विकत घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी वापरला. त्यात मुंबईत मरीन ड्राईव्ह तसेच एलीट टॉवर (लंडन), आणि फॉर्च्यून एफ प्रोजेक्ट (दुबई) आणि विविध ठिकाणी देशात व विदेशात मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. या सरकारच्या कालखंडात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांसह पोलीस यंत्रणा प्रचंड दबावाखाली काम करीत होते. अनेक अधिकारी या दडपणाखाली तक्रारी फाईल करून ठेवत असल्याचा दावा देखील, राऊत यांनी केला आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.