Sanjay Raut on Kirit Somaiya: शिवसेना नेते संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक चांगलेच गाजते आहे. यामध्ये त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. ‘ईडी’चे अधिकारी आणि मध्यस्थ (एजंट) यांच्या संबंधांची धक्कादायक माहिती या पुस्तकात तपशीलवार नमूद केली आहे.
‘ईडी’च्या माध्यमातून झालेल्या त्रासामुळे खासदार संजय राऊत यांनी प्रारंभी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहीले. मात्र त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या पत्रात ‘ईडी’चे चार-पाच अधिकारी दिल्लीतून सबंध देशातील विरोधी पक्षांना छळत आहेत.
त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धमक्या देऊन वसुली केली जात आहे. त्यासाठी एजंट कार्यरत आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या हे देखील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही वसुली करतात. अधिकारी संबंधीतांना नोटीस बजावतात. चौकशीची दहशत निर्माण करतात. त्यानंतर वसुली होते, असा थेट हल्ला पुस्तकात आहे.
मुंबईत गुन्हेगारी टोळ्या खंडणी वसूल करीत असत. त्यांची सुनावणी न्यायालयात होत होती. मात्र ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून केली जाणारी वसुली आणि छळ याची कोणत्याही कोर्टात सुनावणी होत नाही. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी निर्माण झालेली ‘ईडी’ स्वतःच भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटली आहे, असा दावा राऊत यांनी केला.
मुंबईत जितेंद्र नवलानी हे ‘ईडी’च्या वतीने एजंट म्हणून काम करीत होते. अल्पशिक्षित असलेल्या या व्यक्तीच्या सात कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये ‘ईडी’ने नोटीस बजविलेल्या कंपन्यांनी कोट्यावधी रुपये जमा केले. याशिवाय मुंबईत फिरोज शामा, फरीद शामा, रोमी भगत हे देखील एजंट होते. त्यात किरीट सोमय्या यांचा देखील नवलानी यांच्यासोबत संपर्क होता. किरीट सोमय्या हे त्यांचे मुख्य दलाल होते. ६९ कंपन्यांनी दिलेले पैसे आणि त्याचा व्यवहार याचा सविस्तर तपशील पुस्तकाच्या पान क्रमांक ५८ वर देण्यात आला आहे.
पीएमसी बँकेत मोठा घोटाळा झाला. बँकेतील पैसे निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन या कंपनीत गुंतवण्यात आले. या कंपनीचा किरीट सोमय्या कुटुंबाशी काय संबंध आहे? असा प्रश्न केला. पीएमसी प्रकरण उकरून काढून बांधवाना यांना ब्लॅकमेल करण्यात आले. त्यातील कोट्यावधींची जमीन सोमय्या यांनी आपले फ्रंटमॅन लधानी यांना पुढे करून अवघ्या साडेचार कोटीत खरेदी केली. कंपनीचे संचालक सोमय्या कुटुंब आहे, असा खळबळजनक दावा पुस्तकात करण्यात आला आहे.
‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात संजय राऊत यांनी भाजप नेते सोमय्या यांच्या विषयी अतिशय खळबळ जनक दावे केले आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांनी मिळून ‘ईडी’च्या माध्यमातून अनेकांना धमकावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जवळपास १०० बांधकाम व्यावसायिकांनी कोट्यावधी रुपये मध्यस्थांना दिले, असे राऊत म्हणतात.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.