

नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून साधू-महंतांसाठी उभारण्यात येणाऱ्या साधूग्रामकरिता तपोवनातील तब्बल १८०० झाडे तोडण्यात येणार आहेत. परंतु पर्यावरण प्रेमी नाशिककरांनी त्यास कडाडून विरोध दर्शवला आहे.
तपोवनातील ५४ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. ही जागा मोकळी करण्यासाठी येथील झाडांचे सर्वेक्षण करुन सुमारे १८०० झाडांवर महापालिकेने फुली मारली आहे. ही झाडे तोडली जाणार आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी देखील स्पष्ट केले आहे की, साधुग्रामची जागा कुंभमेळ्यासाठीच आरक्षित असल्याने झाडे तुटणारच आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी अधिक संतापले आहेत.
कुंभमेळ्यासाठी १८०० झाडे तोडली जात असताना शहरातील तीन्ही आमदार गप्प का आहेत? असाही सवाल पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. पर्यावरण प्रेमींनी येथील झाडांवर काही कागदी बॅनर(बोर्ड) चिटकवले आहेत. त्यावर मंत्री महाजन यांच्यासह शहरातील आमदारांना वृक्ष वाचविण्याची साद घातली आहे.
गिरीश काका, राहुल भाऊ, फरांदे ताई, मी काय गुन्हा केला? मला वाचवा..असे या बोर्डवर लिहले आहे. वेगवेगळ्या आशयांचे बोर्ड झाडांवर चिटकवण्यात आले असून तपोवणातील झाडे तोडण्यात येऊ नये अशी साद पर्यावरणप्रेमींनी मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांना घातली आहे.
साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली १८०० झाडांची कत्तल केली जाणार असल्याने त्याविरोधात नाशिककर आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाची सुद्धा आता झोप उडाली आहे. तुम्ही लाकुड घेऊन या आम्ही दांडा घेऊन येतो असा इशारा पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाला दिला आहे. एक झाड तोडल्यास दहा झाडे लावू असे गिरीश महाजन म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा देखील पर्यावरणप्रेमींनी निषेध केला आहे. अशाप्रकारे झाडांच्या कत्तली चालवल्या तर कुंभमेळामंत्र्यांनाच पाठीवर ऑक्सीजन सिलेंडर लावून फिरावं लागेल या भाषेत पर्यावरणप्रेमी आपला राग व्यक्त करत आहेत.
गिरीश महाजन स्वत:ला हुकुमशाह समजतात का? त्यांना संविधान मान्य नाही का?एका बाजूला महानगरपालिका सुनावणीसाठी तारीख देते आणि दुसऱ्या बाजुला महाजन हे सुनावणी होण्याआधी निकाल देतात. या देशात लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी निवडणुकीत तर केलंच आता उरलं सुरलं पर्यावरणाबाबत पण करत आहेत असा आरोप पर्यावरण प्रेमी राजू देसले यांनी केला. गिरीश महाजन हे जळगावला राहतात, जळगावात तापमानाची काय परिस्थिती आहे ते त्यांना चांगल माहिती आहे. ते नाशिकला का उद्ध्वस्त करायला निघाले माहित नाही अशा संतप्त भावना राजू देसले यांनी व्यक्त केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.