

Tukaram Mundhe Vs Sanjay Savkare: एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा आणि तंबाखू बंदीच्या विरोधात कंबर कसली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. पण अशातच मंत्री संजय सावकारे यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गुटखा आणि तंबाखू बंदीच्या अंमलबजावणीवर बोलताना राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी एक अजब विधान केले आहे. लोक खातात म्हणून विक्रेते गुटखा तंबाखू विकतात, जर लोकांनी खाणंच बंद केलं तर विक्रीचा विषयच येणार नाही,असं वक्तव्य संजय सावकारे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
तंबाखू हा विषय खूप पुरातन काळापासून चालत आलेला असून लोक तो मोठ्या प्रमाणावर वापरतातलोक खातात म्हणून दुकानदार किंवा विक्रेते तो विकतात. लोकांनी खाणं बंद केलं तर विक्रीचा प्रश्नच उरणार नाही, असं अजब तर्क सावकारे यांनी मांडला.घरगुती तंबाखू खाणाऱ्यांवर जर मोक्का लावला, तर ते अंगाशी येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी, खाणाऱ्यांचे प्रबोधन करून त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी तंबाखू खाऊ नये, असं आवाहन मंत्र्यांनी केलं आहे.
गुटखा आणि तंबाखूविरोधात राज्यात कठोर कारवाई सुरू असताना मंत्री संजय सावकारे यांनी केलेले विधान आश्चर्यचकित करणारे आहे. "लोक खातात म्हणून विक्रेते गुटखा आणि तंबाखू विकतात. लोकांनी खाणं बंद केलं तर विक्रीच बंद होईल," असे ते म्हणाले. वरकरणी हे विधान सोपे वाटत असले, तरी त्यामागचा तर्क धोकादायक ठरू शकतो.
जर "मागणी आहे म्हणून विक्री होते" हा युक्तिवाद मान्य करायचा असेल, तर मग दारू, अमली पदार्थ, बनावट औषधे किंवा इतर बेकायदेशीर वस्तूंबाबतही हाच नियम लागू करावा लागेल का? कायद्याचे काम केवळ जनजागृती करणे नसून, समाजासाठी घातक असलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे हेही आहे. त्यामुळे बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा माफियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा वेळी सरकारमधील एका मंत्र्यांकडून विक्रेत्यांपेक्षा ग्राहकांवरच जबाबदारी टाकणारे विधान येणे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. तंबाखूमुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजार होतात, याबाबत शासकीय यंत्रणाच वर्षानुवर्षे जनजागृती करत आहे. मग त्याच सरकारमधील मंत्री गुटखा विक्रेत्यांवरील कारवाईपेक्षा "लोकांनी खाणं बंद करावं" यावर भर देत असतील, तर त्याचा चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
घरगुती तंबाखू खाणाऱ्यांवर मोक्का लावल्यास ते अंगाशी येईल, असे सावकारे म्हणाले. प्रत्यक्षात मोक्का सामान्य ग्राहकांवर नव्हे, तर संघटित गुन्हेगारी आणि बेकायदेशीर जाळे चालवणाऱ्यांवर लावला जातो. त्यामुळे अशा विधानांमुळे गुटखा माफियांविरोधातील मोहिमेची धार बोथट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जनजागृती आवश्यकच आहे; पण त्याचबरोबर कायद्याचा धाकही तितकाच महत्त्वाचा आहे. अन्यथा "लोक मागणी करतात म्हणून विक्री होते" हा युक्तिवाद उद्या अनेक बेकायदेशीर व्यवसायांना अभय देणारा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.