
Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये अपेक्षित यश मिळालं पण विधानसभा निवडणुकीत गणितं फिरली. त्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती सुरु झाली.
ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गट व अन्य पक्षात गेले. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रयत्न करुनही अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, डॅमेज कंट्रोलसाठी चक्क पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच नाशिकच्या मैदानात उतरत आहेत.
त्यासाठी १६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये उबाठा गटाचे शिबिर होत आहे. उद्धव ठाकरे स्वत: या शिबिरात कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाने सपाटून मार खाल्ला. सत्ता गेल्याने ठाकरेंचे निष्ठावंत एकापाठोपाठ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत.
अशात आगामी महापालिका निवडणूकीत पक्षाला पुन्हा भरारी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती हे शिबिर होत आहे. उत्तर महाराष्ट्रात होत असलेलं ठाकरे गटाचं शिबिर फलदायी ठरेल का? उद्धव ठाकरेंना कितपत यश मिळेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने ठाकरे गटाला पराभव विसरुन आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने या शिबिराच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांबाबत अद्याप अनिश्चितता असली तरी ठाकरे गट मात्र विधानसभेला जे झालं त्यातून धडा घेत आता आधीच कामाला लागला आहे. शिबिराच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांना कानमंत्र दिला जाणार आहे. विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामागील कारणे समजून त्यावर विचारमंथन केलं जाणार आहे.
दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले होते. त्यात सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी तर उपजिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांची जिल्हाप्रमुखपदी बढती करण्यात आली.
नाशिक महानगपालिकेची निवडणूक लक्षात घेता हा बदल पक्षाने केला आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास नाशिक व जळगाव दोन्ही जिल्हे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तसेच धुळे व नंदुरबारचा ही विचार पक्षाला करावा लागणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने या शिबिरात काही रणनिती आखली जाते का हेही पाहावे लागणार आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे दोन गट तयार झाले. त्यात सर्वांधिक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांनाच साथ दिली. एकनाथ शिंदे यांना कायद्याने पक्षाचे चिन्ह, नाव सर्व मिळालं. त्यामुळे शिंदे गटात मोठं इनकमिंग वाढलं. पक्षाला लागलेली हीच गळती थांबवून आता नव्याने उभारणी करण्याची गरज आहे. शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणून होणारी गळती थांबविली तर उद्धव ठाकरेंना यश आलं म्हणता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.