
Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापार्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी ग्रामपंचायतीने घेतला आहे. या ठराव लवकर जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे, असे मढी ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या ठरावावरून वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) या ठरावाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हा ठराव असंविधानिक असून, याबाबत जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्याची तयारी केली आहे.
भटक्याची पंढरी म्हणून मढी यात्रा ओळखली जाते. कानिफनाथ यात्रेला होळीपासून सुरवात होते. ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत सुरू असते. ही यात्रा म्हणजे दुखवट्याचा काळ असतो. मात्र यात्रेतील मुस्लिम (Muslim) व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत. यातून भाविकांच्या भावनांना ठेच पोचते, यातून मढी ग्रामपंचायतीने मुस्लिमांना बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे.
कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा आहे. महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो. पारंपारिक पद्धतीने महिनाभरापूर्वी देवाला तेला लावले जाते. या काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाही. पलंग, गादी वापरत नाहीत. याच परंपरा यात्रेत सहभागी होणाऱ्या इतर भाविकांना देखील लागू होतात. पण, त्याचे पालन केले जात नाही. यावरून मढी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मढी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी एक महिन्यावर कानिफनाथांची यात्रा आली आहे. या यात्रेत बहुसंख्य व्यापारी मुस्लिम असतात आणि ते परंपरा पाळत नाहीत. या काळात महिनाभर देवाला तेल लावले जाते. हा काळ दुखवट्याचा असतो. या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही, शेतीची कामं करत नाही. तेलात तळलेले पदार्थ खात नाही. गादी आणि पलंग देखील वापरत नाही,असे सांगितले.
यात्रेनिमित्ताने गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावनांना ठेच लागते. कुंभ मेळाव्याच्या धर्तीवर मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव मढी ग्रामपंचायतीने घेतला आहे. हे लोक स्वतः कुंकू वापरत नाहीत. ते आम्हाला कुंकू विकतात. काही मुस्लिम व्यापारी दोन नंबरचे धंदे करतात. भाविकांची लूट होते. या अगोदर भाविकांना मारहाण देखील झाल्याचे प्रकार घडल्याचे संजय मरकड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मढी ग्रामपंचयातीच्या या ठरावाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. हा ठराव असंविधानिक आहे. असा ठराव घेणाऱ्या मढी ग्रामपंचायतीविरोधात कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठरावाविरोधात निषेध नोंदवण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.