Prakash Ambedkar on Modi's Uniform Civil Law : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता कायद्यावर चर्चा घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. पण त्या कायद्याचा मसुदाच तयार नाही. आधी तो जाहीर करा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केले आहे. (Criticized the central government and Prime Minister Narendra Modi)
विधी आयोगानेही त्यावर सूचना मागविल्या आहेत. मात्र, ज्या कायद्याबाबत चर्चा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, त्याचा मसुदा असणे गरजेचे आहे. अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आज (ता. ७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधी आयोगाने समान नागरी कायद्यावर चर्चा करण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाबाबत त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
कायद्याचा मसुदाच तयार नाही तर चर्चा कशावर करावी, प्रतिक्रिया कशावर द्याव्यात, असा प्रतीप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कायद्याबाबत घाईघाईत निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे सध्या भाजपकडे निवडणुकीसाठी कोणताही मुद्दा उरला नाही. त्यामुळे समान नागरी कायद्यावर चर्चा सुरू करण्यात आली आहे.
हिंदू समाजातच भांडणे लावण्याचा प्रकार सध्या हिंदूंचे ठेकेदार म्हणविणाऱ्या आरएसएसकडून सुरू असल्याचा आरोपही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ज्या कायद्यावर केंद्र सरकार चर्चा घडवून आणू पाहते आहे, त्या कायद्याचा मसुदा आधी प्रसिद्ध करावा, असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
समान नागरी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान हे सध्या ‘बावर्ची’च्या भूमिकेत वागत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांना घरात काय आहे, गॅस आहे किंवा नाही, धान्य आहे किंवा नाही, याचीच माहिती नाही आणि ते स्वयंपाक करायला निघाले आहेत. त्यांचे घरच खाली असल्याचे सांगून, आंबेडकर यांनी समान नागरी कायद्याच्या मसुद्यावरून मोदींना लक्ष्य केले.
कोणती विवाहपद्धत स्वीकारणार, ते स्पष्ट करा..
संविधानावरील चर्चेत समान नागरी कायद्याबाबत बाबासाहेबांनी (Dr. Babasaheb Ambedkar) जबाबदारी घेतली होती. तेव्हा हिंदूंच्या विवाह पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. समान नागरी कायदा करायचा म्हणजे, सध्या प्रचलित असलेल्या विवाह पद्धतींपैकी एक स्वीकारावी लागेल. ब्राह्मण आणि क्षत्रियांची होम आणि फेरे घेऊन होणारा विवाह की इतरांचा अंतरपाट धरून होणारा विवाह यांपैकी कोणत्या विवाह पद्धतीचा स्वीकार करणार आहे, ते आधी भाजप (BJP) व आरएसएसने स्पष्ट करावे, असे आव्हानच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.