

Amravati MLC Election: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मंगळवारी (2 जून) छाननीच्या दिवशीच मोठा राजकीय भूकंप झाला. अपक्ष म्हणून शेवटच्या क्षणी मैदानात उतरलेले शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कायदेशीर त्रुटींचे आक्षेप ग्राह्य धरत थेट अवैध (बाद) ठरवला. बाजोरियांसारखा बडा चेहरा रिंगणातून बाहेर पडल्यामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. दरम्यान, या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्थगिती आणणार असल्याचा इशारा बाजोरियांनी दिला आहे. यामुळे ही निवडणूक कोर्टाच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विप्लव बाजोरिया यांनी सोमवारी अगदी शेवटच्या क्षणात अपक्ष अर्ज दाखल करून सर्वांनाच धक्का दिला होता. ते परभणी-हिंगोलीचे माजी आमदार असून तिथून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अमरावतीत उडी घेतली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या छाननीदरम्यान भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्यासह उर्वरित तिन्ही उमेदवारांनी बाजोरियांच्या अर्जावर एकत्र येत जोरदार आक्षेप नोंदवले.
* संपत्तीचे अपूर्ण विवरण: बाजोरिया यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची सविस्तर माहिती नियमानुसार मुख्य रकान्यांमध्ये न भरता ती केवळ जोडपत्रात दिली होती, असा आक्षेप घेण्यात आला.
* शपथेवरील सही गायब: नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्राच्या पान क्रमांक ११ वर शपथ संपली होती, मात्र त्यानंतर जोडलेल्या इतर परिशिष्टांवर त्यांची शपथेवर सही नसल्याचे विरोधी वकिलांनी निदर्शनास आणून दिले.
या आक्षेपांवर जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर आणि निवडणूक निरीक्षकांसमोर तब्बल 3 तास मॅरेथॉन सुनावणी झाली. बाजोरियांच्या वकिलांनी "पूर्वीच्या निवडणुकीतही अशीच पद्धत वापरली होती" असा युक्तिवाद केला, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावत, "दिलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज भरलेला नसल्याने" तो अवैध ठरवला.
बाजोरियांचा अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या रिंगणात केवळ चार उमेदवार अधिकृतपणे शिल्लक राहिले आहेत. आजच्या छाननीत खालील उमेदवारांचे अर्ज वैध ठरले:
1. प्रवीण पोटे (भाजप - महायुती)
2. हर्षजीत देशमुख (काँग्रेस - महाविकास आघाडी)
3. डॉ. निलेश विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी)
4. प्रशांत महल्ले (अपक्ष)
बाजोरिया मैदानात असल्याने ही लढत त्रिकोणी किंवा चौरंगी होणार असे दिसत होते. शिवसेना आणि युवा स्वाभिमानी पक्ष आपल्यासोबत आहेत, असा दावा बाजोरिया यांनी केला होता. महायुतीची मते फुटल्यास याचा फायदा थेट काँग्रेसला होण्याची शक्यता होती. मात्र आता मुख्य लढत महायुतीचे प्रवीण पोटे आणि मविआचे हर्षजीत देशमुख यांच्यातच एकवटण्याची चिन्हे आहेत.
अर्ज बाद झाल्यानंतर विप्लव बाजोरिया यांनी प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला की, "सर्व चारही उमेदवारांनी संगनमत करून माझ्यावर आक्षेप घेतले आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव निर्माण केला. हा थेट लोकशाहीचा खून आहे."
आपण या अन्यायाविरोधात गप्प बसणार नसून, बुधवारीच (३ जून) उच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, न्यायालयातून स्थगनादेश मिळवून पुन्हा रिंगणात उतरण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी ४ जून रोजी (अर्ज माघारीच्या दिवशी) अमरावतीच्या राजकारणात काय अंतिम चित्र उभे राहते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.