
Yawatmal News : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी-हिंदीच्या मुद्द्यावरुन तब्बल 20 वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. विजयी मेळाव्यानंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी युतीचे संकेत दिल्यानंतर घडामोडींना वेग आला होता. पण राज ठाकरेंनी आदेश काढत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीला 'वेटिंग मोड'वर टाकले. आता याचदरम्यान,मनसेनं तिकडे थेट प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
यवतमाळमध्ये मनसेनं बच्चू कडू यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकरांनी गुरुवारी (ता.10 जुलै) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या शेतकर्यांसाठीच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याची घोषणा केली.
नांदगावकर म्हणाले, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी दिंडी काढलेली आहे.कडू यांच्या या दिंडी काढण्यामागं शेतकरी सातबारा कोरा होण्यासह अजूनही काही प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचंही राज ठाकरेंना यांना म्हटलं. तसेच या दिंडीला, पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आल्याचंही बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितलं.
त्यावेळी राज ठाकरे यांनी माझ्या मागणीला तत्काळ होणार दिला. ते म्हणाले,या दिंडीला केवळ पाठिंबा देऊ नको,तर तू स्वतः त्या ठिकाणी जा. बच्चू कडू यांच्या दिंडीत सहभागी होऊन शेतकऱ्यांना निरोप दे की, त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत असल्याचं सांग.मात्र, आता सरकारला म्हणावं,कोठूनही पैसे आणा, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,असंही नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
नांदगावकर म्हणाले, मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की,बच्चू कडू ताठ कण्याचे लढाऊ बाण्याचे व्यक्तिमत्व आहेत. एक प्रामाणिक माणूस जर अशा प्रकारचा लढा पुढे घेऊन जात असेल,तर त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभे राहायला हवे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तो विचार करायला हवा असंही त्यांनी बोलून दाखवलं.
दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे.केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पैसे आणा. राज्यानं जीएसटीच्या माध्यमातून 31 हजार कोटी रुपये दिले. यूपीसारख्या राज्यांनी केवळ 9 हजार कोटी रुपये दिले. केंद्र सरकारनं मग महाराष्ट्राला पैसे द्यायला नकोत का, असा संतप्त सवालही नांदगावकर यांनी केला.
तसेच शेतकरी कर्जमुक्ती करा,सातबारा कोरा करा सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का?जर तुमच्याकडे पैसे नाहीत. तुमच्याकडे पैसे नसेल तर, कुठूनही आणा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असं बाळा नांदगावकर यांनी ठणकावलं.
बच्चू कडू यांनी राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानले,ते म्हणाले,महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूराने सुखाचा श्वास घ्यायला हवा.शेतकऱ्यांचे मरण थांबले पाहिजे. बाळा नांदगावकर इथे आले. त्यांचे निश्चितच आम्ही आभार मानतो. देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे जेव्हासोबत राहतील, तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा मिळेल, असा विश्वासही कडू यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.