

Chandrapur Municipal Corporation : बहुमताच्या अगदी जवळ असताना चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय नेतृत्वाने घेतली असून, सत्ता समीकरणापासून काँग्रेस का दूर राहिली, याला जबाबदार कोण, याचा अहवाल मागविण्यात आला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मतभेदानंतर पक्षाने चंद्रपूर मनपा सत्ता समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी निरीक्षक म्हणून काँग्रेस नेते सुनील केदार यांची नेमणूक केली होती. आता केदार यांचा अहवाल दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.
बहुमतासाठी 34 जागांची आवश्यकता असताना काँग्रेसला मित्रपक्षांसह 30 जागा मिळाल्या. मात्र, निकालाच्या दिवशीच खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांनी नगरसेवकांची पळवापळवी केली. त्यांचा वाद पराकोटीला पोहोचला. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतरही वाद मिटला नाही. दरम्यान, 13 नगरसेवकांचा गट खासदार धानोरकर समर्थक नगरसेवकांनी तयार केला. प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले. त्यानंतर तोडगा निघाला.
बहुमताची जुळवाजुळव आणि दोन्ही नेत्यांमध्ये समन्वयाची जबाबदारी पक्षाने केदार यांच्यावर दिली. केदार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना सत्तेत सामावून घेण्यासाठी चर्चा केली. मात्र, प्रत्यक्ष महापौर निवडीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. उबाठाचे 6 आणि 2 अपक्ष सदस्यांनी 24 सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. वंचितचे 2 सदस्य अनुपस्थित राहिले. एमआयएमचा सदस्य तटस्थ राहिला. त्यामुळे एका मताच्या फरकाने भाजपचा महापौर निवडून आला.
या राजकीय घडामोडीचे तीव्र पडसाद उमटले. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने वंचित बहुजन आघाडीने शहराध्यक्षांवर बडतर्फीची कारवाई केली. सुरूवातीला उबाठाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बहुमताच्या जवळ असतानाही खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील संघर्षामुळे सत्ता गमवावी लागली, असा समज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पसरला आहे. प्रदेश नेत्यांचीही साधारण अशीच भूमिका आहे.
राज्यात काँग्रेसची वाताहत होत असताना चंद्रपूरमध्ये पक्षाला यश मिळत होते. परंतु, नेत्यांतील भांडणामुळे आलेली सत्ता गमवावी लागली. विशेषतः चंद्रपूर महानगर पालिकेतील सत्ता हातातून जाणे काँग्रेसच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. आता या प्रकरणाची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेतली असून, यासंदर्भात केदार यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात आला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही याला दुजोरा दिला. मात्र, अहवाल गेल्यानंतर नेमकी कारवाई होईल की नेहमीप्रमाणे केवळ कागदी सोपस्कार पार पाडले जातील, याकडे आता काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.