
Congress vs BJP Maharashtra : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गेल्या काही दिवसांपासून भाजपविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीतील मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केलेल्या मुद्यांवरून महाराष्ट्रात चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. राहुल गांधींच्या दबावाखाली भाजप आल्याची स्थितीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने राज्यभर मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. गडचिरोली इथं झालेल्या मोर्चात, हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी, यामागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार गडचिरोलीत सपकाळ यांच्या नेतृत्वात मशाल मोर्चा आणि शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 11 वर्षांपासून पंतप्रधानपदावर आहेत, पण 11 वर्षांत त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांतील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी व मुख्यमंत्री फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत". स्वतःला फकीर म्हणविणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किमतीचे जॅकेट्स, कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत, अशी घणाघाती टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो, असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात. पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही, तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात. ‘स्टील सिटी’ करण्याच्या नावाखाली गडचिरोलीतील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत, असा गंभीर आरोप देखील सपकाळ यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांनी 'तिघे भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ', असे भाजप युती सरकारचे सुरू आहे. सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. कर्जमाफी देत नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नव्हते, तर घोषणा का केल्या? लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, 2100 रुपये देण्याची घोषणा केली, पण आता 1500 रुपयेही मिळणे अवघड झाल्याचे सांगितले.
अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात 241 प्रवासी व कर्मचारी होते. ही घटना अत्यंत दु:खद व धक्कादायक आहे. संपूर्ण देश शोकमग्न आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आजपासून पुढील दोन दिवस राज्यभर आयोजित केलेले मशाल मोर्चे स्थगित करून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.