
शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भाजपमध्ये आता गटबाजी, दबाव आणि कुरघोड्या वाढल्या आहेत.
छोट्या छोट्या पदासाठीही नेते दबाव आणत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निवडणे कठीण झाले आहे.
पक्षात शिस्तीपेक्षा प्रतिष्ठेचा प्रश्न मोठा ठरत आहे.
या परिस्थितीमुळे भाजपच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nagpur News : सत्तेत आल्यानंतर शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षातही आता कुरघोड्या, आघाड्या आणि दबावाच्या राजकारणाने शिरकाव केला आहे. छोट्या छोट्या पदासाठी नेते दबावाचे वापर करताना दिसत आहेत. पदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करताना दिसत आहे. याच कारणामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष निवडणे सध्या भाजपच्या नेत्यांना अवघड होऊन बसले आहे. नवा अध्यक्ष पूर्व नागपूरचा की दक्षिण नागपूरचा करायचा यावर सर्व घोडे अडून बसले असल्याचे समजते. याकरिता या दोन्ही मतदारसंघाच्या आमदारांनी यासाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे आता भाजपची शिस्त बिघडली की नेते पक्षापेक्षा मोठे झाले असा सवाल कार्यकर्त्यांसमोर चर्चेला येत आहे.
भाजपने अलीकडेच शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. ज्येष्ठ नेते व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांना अध्यक्ष करून त्यांच्याकडे सर्व सूत्रे दिली आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल केले आहे. तिवारी यांना अध्यक्ष करून अनुभवी नेता पक्षाचा जास्त कामाचा असा संदेश यातून देण्यात आला आहे.
तत्पूर्वी भाजपने युवा नेत्यांना संधी देण्याचा प्रयोग केला होता. त्यामुळे नव्या समस्या निर्माण झाल्या होत्या. ज्येष्ठ व अनुभवी नेते पक्षापासून दुरावत चालले होते. ते नावालाच कार्यक्रमांना हजेरी लावत होते. जबाबदारी घेत नव्हते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान हे चित्र प्रामुख्याने दिसून आले.
यामुळे भाजपने रिव्हर्स गिअर टाकला असून आता पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये तसेच पत्रकार परिषदांमध्ये मंचावर ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती दिसू लागली आहे. दयाशंकर तिवारी यांनी शहराची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. त्यावर अद्याप कोणीही आक्षेप घेतला नाही. खासगीत नाराजीसुद्धा व्यक्त करताना कोणीच दिसत नाही.
माजी अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या कार्यकारिणीत असलेल्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा मानाचे स्थान देण्यात आले आहे. सर्वांनीच हा बदल स्वीकारला असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. विविध आघाड्यांचे अध्यक्ष व कार्यकारिणी जाहीर करताना नव्या व जुन्यांना सामावून घेतले आहे. यात काही नवखे तर काही अनुभवींचा समावेश करून बॅलेंस राखला आहे. ही कार्यकारिणी जाहीर करताना भाजपात अंतर्गत वाद निर्माण होणार याचीही खबरदारी घेतली असल्याचे दिसून येते. मुख्य कार्याकारिणी जाहरी करताना फारशा अडचणी शहर अध्यक्ष या नात्याने दयाशंकर तिवारी यांना आल्या नाहीत.
मात्र तिवारी यांची भाजयुमोचा अध्यक्ष निवडताना मात्र चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. सध्या बादल राऊत हे भाजयुमोचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या ऐवजी दक्षिण नागपूरचे भाजयुमोचे अध्यक्ष कुलदीप माटे आणि पूर्व नागपूरचे अध्यक्ष संजय तरार यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. माटे यांना शहराचा अध्यक्ष करावा यासाठी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते आग्रही आहेत.
दुसरीकडे भाजयुमोचा अध्यक्ष पूर्व नागपूरचा करावा यासाठी आमदार कृष्णा खोपडे अडून बसले असल्याचे सांगण्यात येते आहे. यामुळे आता भाजयुमो अध्यक्षाच्या नावाची घोषणा रखडली आहे. तर आता नागपूर शहरासह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपची शिस्त बिघडली की नेते पक्षापेक्षा मोठे झाले असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
प्रश्न 1: सध्या भाजपमध्ये कोणता वाद सुरू आहे?
उत्तर: भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निवडण्यावरून वाद सुरू आहे.
प्रश्न 2: या वादाचे कारण काय आहे?
उत्तर: छोट्या पदांसाठी नेत्यांकडून दबावाचे राजकारण आणि कुरघोडी होत आहे.
प्रश्न 3: भाजप कोणत्या प्रतिमेसाठी ओळखला जातो?
उत्तर: शिस्तप्रिय पक्ष म्हणून.
प्रश्न 4: या वादामुळे पक्षावर काय परिणाम झाला?
उत्तर: पक्षात गटबाजी आणि असंतोष वाढल्याचे दिसत आहे.
प्रश्न 5: हा वाद कोणत्या पातळीवर आहे?
उत्तर: भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निवडीच्या पातळीवर हा तिढा निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.