
Kamalatai Gavai: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तसेच रिपाइं नेते, माजी मंत्री रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं त्यांनी स्वतः एका अधिकृत पत्राद्वारे जाहीर केलं आहे. त्यामुळं यावरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. आपल्या प्रकृतीचं कारण देत त्यांनी आपण संघाच्या अमरावतीतील कार्यक्रमाला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण आपण जरी या कार्यक्रमाला गेलो असतो तरी तिथं आंबेडकरी विचारचं मांडले असते अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका पत्रातून मांडली आहे. त्यामुळं राजेंद्र गवई यांनी नुकतेच त्यांच्या मातोश्रींनी संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्विकारलं असल्याच्या दाव्यालाही अर्थ राहिलेला नाही. त्याचबरोबर कमलाताई गवईंच्या नावे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्राबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
कमलाताई गवई आपल्या अधिकृत पत्रात म्हणतात, "पाच ऑक्टोबरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पत्र समाज माध्यमांवर व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालं आहे. ते पत्र आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या कुणीतरी समाजबांधवानं लिहिलं असावं. त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही. या कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी माझ्या ओळखीतील काही लोकं आलं होते. आमच्या सर्वांप्रती मंगलभावना व मंगलकामना असतात. त्यामुळं आम्ही सर्वांचे स्वागतच करतो. आमचा मैत्रीभाव व बंधुभाव हा सर्वांप्रती आहे. परंतु या कार्यक्रमाचे वृत्त प्रसारित झाल्याबरोबर अनेकांनी माझ्यावरच नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावरसुद्धा टीकाच नव्हे तर दोषारोपण केले.
आम्ही आंबेडकरी विचाराला वाहून घेतले आहे. दादासाहेब गवई यांचे जीवन तर आंबेडकरी चळवळीलाच समर्पित होते. दुसऱ्या विचारधारेच्या मंचावर आपले विचार मांडणेही गरजेचे असते. यासाठीही धाडस लागते, सिंहाचे काळीज लागते. दादासाहेब जाणूनबुजून अशा विरोधी मंचावरती जायचे, तेथे वंचितांचे प्रश्न मांडायचे हा त्यांच्या धोरणाचा भाग होता. आपल्याशी असहमत असलेल्यांनाही आपली भूमिका ऐकवावी, असे त्यांचे मत होते. ते संघाच्या कार्यक्रमात गेले, पण त्यांनी हिंदुत्व कधीही स्वीकारले नाही. त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर भाषण केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संवैधानिक विचारांची मांडणी केली.
मी त्या विचारमंचावर गेले असते तरीही आंबेडकरी विचार आणि विपश्यनाच मांडली असती. स्मृतिशेष दादासाहेब याच विचाराने त्या विचारधारेच्या मंचावर गेले आणि तिथे त्यांनी आंबेडकरी विचारच मांडले. आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार. ते आपण शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. हा आपल्या संस्काराचा भाग आहे. तरीही माझ्यावर आणि स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर वस्तुस्थितीला धरून नसलेली टीका झाली व अजूनही होत आहे. एका कार्यक्रमामुळे ते कलंकित करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथित व दुःखी झाली आहे. माझे जीवन तर आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहून घेतले आहे. माझे वय ८४ असून माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत आहे. कुठेतरी थांबले पाहिजे, या कारणाने पाच ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला जाणार नाही एवढे खरे," असे डॉ. कमलताई गवई यांनी या पत्रात नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.