
Uddhav Thackeray assembly election remark : लोकसभेच्या निवडणुकी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे आमच्या सर्वांच्याच अंगात विजयश्री संचारली होती. प्रत्येकाला आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्वप्ने पडत होती.
त्याकरिता आघाडीतील तीनही पक्षात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी स्पर्धा लागली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आमचे मोठे नुकसान झाले असल्याची कबुली काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. निवडणुकीच्या वेळी सर्वांच्याच डोक्यात हवा गेली होती या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला त्यांनी दुजोराही दिला. यावरून आता आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीत झालेल्या घडामोडींबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याबाबत विचारणा केली असता वडेट्टीवार म्हणाले, "ही मुलाखत अजून बघितली नाही. माध्यमातून थोडेफार कानावर आले. लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे काम व्यवस्थित झाले होते. त्यानंतर सर्वांच्या डोक्यात विजयाची हवा संचारली होती. आम्हीच जिंकणार असे आघाडीतील सर्वच पक्षांना वाटायला लागले होते".
'आम्ही सुमारे दीड महिना चर्चेत आणि जागा वाटपाच्या वाटाघाटीत घालवला. प्रचार आणि प्लानिंगचे सुमारे 40 दिवस यात वाया गेले. या दरम्यान आघाडीच्या सुमारे 28 ते 30 बैठका झाल्या. मात्र शेवटपर्यंत व्यवस्थित नियोजन होऊ शकलो नाही. उद्धवजी जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. मीसुद्धा कोणाकडे बोट दाखवणार नाही', असेही वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले.
प्रत्येकाला अधिक जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या होत्या. सगळ्यांच्या डोक्यात हवा गेली होती. उद्धव ठाकरे यांनी हे मान्य केले. मीसुद्धा हे मान्य करतो, असेही वडेट्टीवारांनी सांगितले. विशेष म्हणजे वडेट्टीवारांनी पराभवाची जबाबदारी घेऊन तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती. लोकसभेच्या यशाचे श्रेय घेणाऱ्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी म्हटले होते.
'विधानसभेत महाविकास आघाडीतील घोळामुळे पराभव झाल्याचे मान्य केल्यानंतर वडेट्टीवारांनी भाजपलाही दोष दिला. विरोधकांना नामशेष करणे ही भाजपची रणनीती आहे. प्रत्येक राज्याच्या राजकारणात बघितले तर हेच दिसून येते. संविधानाची हत्या करायची, मतदारांचे मत चोरून कसही निवडणुका जिंकायच्या हा भाजपचा अजेंडा आहे', असा आरोप वडेट्टीवार यांनी दिला.
'विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेतील लोकांविषयी जनतेत प्रचंड रोष होता. लोकसभेच्या निवडणुकीत तो दिसून आला. मात्र सहा महिन्यात इतका फरक पडू शकतो यावर कोणाचा विश्वास बसत नाही. आघाडीत जागा वाटपाचाही मोठा घोळ झाला. सोबतच मतदार यादीतही घोळ होता. आम्हाला त्याकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळाले नाही', असेही वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.