

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या हत्येला ‘वध’ असे संबोधले. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठली. विरोधी पक्ष भाजपने तर त्यांच्यावर टीकांचा भडिमार केला. पण महाविकास आघाडीत त्यांच्या सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील (Pravin Kunte Patil) यांनी पटोलेंवर कडवी टिका केली आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारूही शकतो’, असे वादग्रस्त विधान करून देशभरातील लोकांचा रोष ओढवून घेतला होता. तेव्हा त्यांच्यावर टिका तर करण्यात आल्याच, पण राज्यभर त्यांच्या विरोधात आंदोलने करून भाजपने त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर ‘मी मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोललो होतो’, असे घूमजाव करीत नानांनी बचावात्मक पवित्रा घेतला होती. ते प्रकरण आत्ता आत्तापर्यंत धुमसत होते. ते थंड होत नाही तोच महात्मा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य करून पटोलेंनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतला आहे.
पटोलेंच्या त्या वक्तव्याचा समाचार घेताना प्रवीण कुंटे पाटील म्हणाले की, नाना भाऊ, महात्मा गांधी यांच्या निर्घृण हत्येला तुम्ही ‘वध’ संबोधित केले. तुमच्या या वक्तव्याला तुमची जीभ घसरली समजायचे की भाजपच्या दीर्घकालीन सहवासाचे संस्कार समजायचे? गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी, असे बेजबाबदार वक्तव्य निषेधार्ह आहे. यासाठी तुम्ही तमाम देशवासीयांची माफी मागायला हवी. तुमच्या पक्षानेही तुमच्यावर कारवाई केली पाहिजे. पण नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही किमान माफी मागणे तरी आवश्यक झाले आहे.
काँग्रेस पक्षात आत्तापर्यंत अनेक प्रदेशाध्यक्ष होऊन गेले. पण नाना पटोले या अध्यक्षांनी काँग्रेसची पत खराब केली. त्यांचे वागणे दुर्भाग्यपूर्ण आहे, हे काँग्रेसला कळले पाहिजे, असेही कुंटे पाटील यांनी म्हटले. मात्र नाना पटोलेंच्या वक्तव्याची जाणीव होताच कॉंग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.'बोलण्याच्या ओघात चुकून तो शब्द वापरला गेला असावा, असे म्हणत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सारवासारव केली आहे. मात्र याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. भाजपचे नेते दुतोंडी आहेत. नरेंद्र मोदी ‘बेटी पढाओ बेटी पटाओ ’म्हणाले तेव्हा बोलताना जीभ घसरली असे भाजपवाले म्हणतात, आणि नानांच्या तोंडातून हत्येऐवजी वध असा एक शब्द चुकून गेला तर भाजपवाले त्यांच्या मनात तेच आहे, असे म्हणतात, मग मोदींच्या मनातही बेटी पटाओ हेच होते का? असा सवालही लोंढे यांनी केला. नथुराम गोडसे दहशतवादी होता आणि त्याने राष्ट्रपित्याचा खून केला. गोडसे मुर्दाबाद, हे पटोले एकदा नाही तर हजार वेळा म्हणतील. पण भाजपचे किती नेते गोडसे मुर्दाबाद म्हणू शकतात का, असा सवालही अतुल लोंढेनी केला.
काय म्हणाले होते नाना पटोले?
“महात्मा गांधींनी अहिंसेच्या माध्यमातून भारताला तर स्वातंत्र्य मिळवून दिलं पण त्याचबरोबर जगालाही संदेश देण्याचं काम या माध्यमातून केलं. आजच्या दिवशीच नथुराम गोडसेने महात्मा गांधीची हत्या केली. नथुराम गोडसेच्या रूपाने देशाने पहिला दहशतवादी पाहिला. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला,” असं म्हटलं. मात्र काँग्रेसनं कायमच महात्मा गांधींचा वध या शब्द प्रयोगाला कडाडून विरोध केला आहे. पण नाना पटोलेंनी ‘महात्मा गांधींचा वध’ हा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.