Maharashtra Politics : नाना पटोले कुणाच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Chandrashekhar Bawankule on Nana Patole BJP Contact : काँग्रसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या काही महिन्यांपासून अलिप्त आहेत. ते काँग्रेसच्या बैठका आणि कार्यक्रमांनासुद्धा उपस्थित राहात नाही. यावरून त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ते पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याचा तर्क लावला जात आहे.
Nana Patole, Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule addressing the media in Bhandara district, clarifying that Nana Patole is not in contact with BJP leaders, amid growing political speculation.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 24 Oct : काँग्रसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या काही महिन्यांपासून अलिप्त आहेत. ते काँग्रेसच्या बैठका आणि कार्यक्रमांनासुद्धा उपस्थित राहात नाही. यावरून त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. ते पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याचा तर्क लावला जात आहे.

अशातच शुक्रवारी भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी नाना पटोले हे आमच्या संपर्कात नसल्याचं स्पष्ट केले. पटोले यांच्याप्रमाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबतही अशा चर्चा सुरू होत्या.

प्रदेशाध्यक्ष असताना नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका करायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा भाजपात प्रवेश देण्यास अनेकांचा विरोध असल्याचे समजते. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नाना पटोले यांची ताकद आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सर्व दिग्गज नेते विरोधात असताना त्यांनी प्रथमच निवडणूक लढणाऱ्या प्रशांत पडोळे यांना निवडून आणले आहे. त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे परंपरागत राजकीय वैर आहे. त्यांना प्रवेश देण्यास भाजपची ही सुद्धा एक अडचण आहे. बावनकुळे यांनी पटोले आमच्या संपर्कात नसल्याने स्पष्ट केल्याने भाजप व महायुतीच्या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.

असे असले तरी राजकारणात काही सांगता येत नाही, सर्व काही बोलता येत नसल्याने अनेकांच्या शंका कुशंका कायम आहेत. नाना पटोले भाजपचे खासदार होते. त्यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून काँग्रेसमध्ये परत प्रवेश घेतला होता. राहुल गांधींना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यास सांगितले होते. किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले होते. गोंदिया भंडाराचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांना त्यांनी लोकसभेत पराभूत केले होते.

त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान दिले होते. मात्र त्यांच्यासमोर पटोले यांचा निभाव लागला नाही. पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या भंडारा जिल्ह्यात परतले. विधानसभेत निवडून आले. त्यांच्या नशिबाने महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आले. त्यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले. मात्र बंडखोर वृत्तीमुळे ते अध्यक्षपदाच्या बंदिस्त खुर्चीत फार काही वेळ रमले नाहीत.

त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या बदल्यात त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना प्रदेशाध्यक्षपद मागून घेतले. त्यानंतर नाना पटोले यांनी संपूर्ण काँग्रेस हाती घेतली. राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेमुळे त्यांना आणखीच बळ मिळाले. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार निवडण्याचे अधिकार त्यांच्या हाती आहे. यात ते यशस्वीसुद्धा झाले. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन आणखीच वाढले.

Nana Patole, Chandrashekhar Bawankule
Sangli Politics : पडळकरांनी धुराडं पेटू देणार नाही, असा इशारा दिलेल्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव रात्रीत बदललं; नवा वाद पेटण्याची शक्यता

त्यांची एकाधिकारशाहीसुद्धा वाढली होती. असे काँग्रेस नेत्यांचेच म्हणणे होते. अनेकांनी दिल्लीत तक्रारी केल्या. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे कोणाचे काही चालले नाही. विधानसभेची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. लोकसभा निवडणुकीचा निकाल बघून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येतील असेच सर्वांना वाटत होते.

असे झाल्यास नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. हे बघता प्रदेशाध्यक्ष या नात्याने महाविकास आघाडीतील तीन पक्षांसोबत वाटाघाटी, बोलणी आणि जागा वाटपाचा निर्णयात त्यांनी जास्तच हस्तक्षेप केला. 100 जागांवर ते अडून बसले होते. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते. याकरिता पटोले जास्तीत जास्त मिळाव्या यासाठी आग्रही होते. जागा वाटपाच्या मात्र शेवटच्या आघाडीत मोठा असंतोष निर्माण झाला.

Nana Patole, Chandrashekhar Bawankule
BJP Politics : 'सर्वांचे मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकलेत..., मंत्री बावनकुळेंच्या वक्तव्याने खळबळ; आगामी निवडणुकीत बंडखोरी होऊ नये म्हणून भाजपचा नवा डाव?

त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. नाना पटोले यांना या सर्व प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आले. निवडणुकीच्या निकालाने पटोल यांच्यासह महाविकास आघाडीला जबर धक्का बसला. संपूर्ण चित्रच पालटून गेले. आघाडीचा दारुण पराभव झाला. पराभवाचे सर्व खापर काँग्रेसने पटोले यांच्यावर फोडले. त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले.

विधिमंडळ पक्षाचे नेते होण्याची त्यांची इच्छाही काँग्रेसने पूर्ण केली नाही. त्यानंतर ते हळू हळू लांब होत गेले. आता दिसेनासे झाले आहेत. भाजपमध्ये आधीच गर्दी झाली आहे. त्यांना परत भाजपमध्ये घेण्यास अनेकांचा विरोध आहे. या उपरही भाजपात गेल्यास पदाचा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपात जाऊन ते काय करणार असा प्रश्न आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्याकडे कुठलीच जबाबदारी देण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com