
राजकारणात माणसं जोडणे महत्त्वाचे आणि त्यासाठी सण-उत्सवांइतका प्रभावी मार्ग दुसरा नाही, हे नव्याने सिद्ध होत आहे. अलीकडे पार पडलेल्या रामनवमीच्या शोभायात्रेने फक्त धार्मिक उन्मेष नव्हे तर राजकीय हालचालींनाही वेग दिला. अकोल्यात सर्वच प्रमुख पक्षांतील नेत्यांनी रामभक्तांचे स्वागत करत आपला सामाजिक सलोख्याचा चेहरा जनतेसमोर मांडला.
या हालचालींमागे एक रणनीती आहे, जी ‘सोशल इंजिनिअरिंग’ या राजकीय तत्त्वज्ञानाशी नाते सांगते. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने विविध वंचित घटकांना एकत्र आणून नव्या राजकीय समीकरणांना जन्म दिला, त्याच पावलावर पाऊल ठेवत आता अन्य पक्षांचे स्थानिक नेतेही चालताना दिसताहेत.
‘वो सियासत ही क्या, जो दिलों को न जीते, जो मजहब से आगे न निकले, वो रस्ते बदल दो’ सण-उत्सवांमध्ये हजेरी लावणे, शोभायात्रांवर पुष्पवृष्टी करणे, धर्मगुरूंशी संवाद साधणे आणि अशा गोष्टींमधून मतदारांशी भावनिक नातं निर्माण करणे हा नवा फॉर्म्युला नाही; पण तो सध्या अधिक आक्रमकतेने वापरला जातोय. रामनवमी, हनुमान जयंती, रमजान ईद, शिवजयंती या सणांचे निमित्त साधून राजकीय नेते सामाजिक सलोखा प्रस्थापित करीत गळ्यात हारही मिरवत आहेत. अकोल्यातील घडामोडी पाहता, सणांचा उपयोग राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी होतोय की सामाजिक ऐक्यासाठी हा प्रश्न बाजूला ठेवत, जनतेनेही या कृतीचे स्वागत केले. कारण सणांच्या निमित्ताने नेते जेव्हा सामान्य जनतेच्या दरबारात हजेरी लावतात, तेव्हा ‘ते आपल्यातील’ असल्याची भावना रुजते.
‘सियासत के बाजार में अब जज्बात बिकते हैं, यहाँ हर चेहरा मुस्कान के पीछे कुछ और लिखते हैं...’ सोशल इंजिनिअरिंगचा यशस्वी नमुना वंचित बहुजन आघाडीने अनेक निवडणुकांमध्ये सादर केला. काही मतदारसंघ पक्षाचे ‘गड’ बनले. हे यश मतदारांच्या सामाजिक व भावनिक रचनेचा अभ्यास करून साधले. आता इतर पक्षही हाच मार्ग अनुसरत असल्याने आगामी काळात सण केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीय दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरणार, हे निश्चित आहे. एकूणच सण-उत्सवांचे रूपांतर ‘राजकीय मंचा’त होताना दिसते. हेच नव्या काळाचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ म्हणता येईल. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवांचे आयोजन जोमात सुरू आहे. काही जण याकडे राजकीय डावपेच म्हणून पाहतात; परंतु समाजहिताच्या दृष्टीने पाहिल्यास हे बदलते नेतृत्व आणि सजग लोकशक्तीचे लक्षण आहे.
‘रंगमंचावरचे असोत वा आयुष्यातले, खरे रंग तेच जे समाजासाठी खुलतात.’
सण-उत्सव हे समाजाच्या एकतेचे, संस्कृतीच्या जपणुकीचे प्रतीक आहेत. जेव्हा राजकारणी या उत्सवांतून सामाजिक उपक्रम राबवतात. जसे आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिला सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम तेव्हा त्या माध्यमातून जनतेपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचतो.
‘सियासत वही जो सेवा बन जाए, हर साज सज्जा में सद्भाव नजर आए’
या सणांमधून नेतेमंडळी जनतेशी थेट संवाद साधतात. त्यांच्या अडचणी, भावना जाणून घेतात. ही पारंपरिक राजकारणापेक्षा एक पाऊल पुढे जाणारी लोकशाही आहे, जिथे सहभाग आहे, समरसता आहे आणि सेवाभाव आहे. ‘चला साजरा करूया सण उत्सव नात्यांचा, इथे मतांचं नव्हे, मनांचं राजकारण घडू दे.’ लोकशाही ही केवळ निवडणूक जिंकण्याची नाही, तर विश्वास जिंकण्याची प्रक्रिया आहे. सण-उत्सवांचा वापर सामाजिक सलोखा, जनहित व परिवर्तनासाठी केला जात असेल, तर हे परिवर्तनाचे पाऊल नाही का? असाही सूर निघत आहे. ‘सण असतो एक निमित्त, माणुसकीचा धागा जोडण्याचा, आणि नेता तोच, जो ते धागे विश्वासाने विणतो’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.