

Prakash Ambedkar statement : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा नागपूरच्या दिशेन ट्रॅक्टर मोर्चा जात आहे. या मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर शेतकरी नेत्यांसह हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.
बच्चू कडू यांच्या या मोर्चावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका वाक्यात टीका केली आहे. 'मंत्रिपदी असताना काय ** मारत होता का?', असा खोचक सवाल केला आहे.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू (Bachchu Kadu) आक्रमक आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात दौरे अन् आंदोलन केली. अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना आता खरी कर्जमाफीची गरज आहे. यासाठी आरपारची लढाई लढण्याची तयारी बच्चू कडू यांनी केली आहे. यासाठी त्यांनी नागपूर रामगिरीवर ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. या मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, तर अजित नवले आणि रविकांत तुपकर हे शेतकरी नेते मोर्चात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मोर्चात सहभागी होताना दिली. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नांदेड इथं पत्रकारांशी बोलताना, एका वाक्यात खोचक अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "लय वल्गना बघितल्या आहेत, त्यामुळे लोकांनी आता फसू नये, मंत्रीपद असताना काय झक मारत होता का?"
नांदेड इथं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली नाही म्हणून, त्यानं तहसिलदारांचे वाहन फोडले. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "सगळ्या शेतकऱ्यांना माझा आवाहन आहे, कलेक्टर तुम्हाला मदत करू शकतो का? तर माझं म्हणणं नाही. पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही. दुखणं कुठे आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल."
"ज्याला तुम्ही सत्तेवर बसवले, तुम्हाला मदत द्यायची का नाही द्यायची, हे सत्तेवर बसवलेल्यांनी ठरवल्याशिवाय अधिकारी कुठून मदत देणार!गाड्या फोडायच्या ना, सगळे आमदार, खासदार सत्ताधारी पक्ष कोण कोण आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे सत्ताधारी आहेत, अजित पवारांचा पक्ष सत्ताधारी आहेत, भाजप सत्ताधारी आहे, या पक्षांच्या नेत्याच्या गाड्या फोडा ना, तुम्हाला न्याय मिळेल," असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
दरम्यान, सरकारने बच्चू कडू यांना चर्चेसाठी आज बैठक ठेवली होती. त्यावर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. 'आजच्या दिवशी बैठक घेणं म्हणजे तुमचा हेतू काय आहे,' असा प्रश्न बच्चू कडू यांचा सरकारला केला आहे. 'आम्हाला तिकडे बोलावून अटक करायचं होतं का? असा गंभीर आरोप करत, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती,' असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला आहे.
'आतापर्यंत अनेक पत्र दिले, बैठक का लावली नाही? तुम्ही निर्णय घ्या, बैठकीचा आम्हाला मानपान द्यायची गरज नाही. आताही इथं येऊन बोलणी होऊ शकते, या आधीच्या आंदोलनात आंदोलन स्थळी येऊन बोलणी झाली आहे. सरकार सगळं बरोबर करते आणि आंदोलन चूक करतात, असं दाखवण्याचा प्रयत्न करू नका. हे तुमच्या अंगलट येईल, असे म्हणत, आम्ही पाच वाजेपर्यंत वाट पाहतो, अन्यथा 'रामगिरी'वर जेवण करायला जाऊ,' असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.