Nagpur News : 'जागर यात्रा' असे गोंडस नाव देऊन महाराष्ट्रभर भ्रमण करून पर्यटनवारी केल्याने काहीही होत नाही. ओबीसींचे कल्याण करायचे असेल तर त्यांच्यासाठी पोटतिडकीने काहीतरी केले पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.
अचानकपणे ओबीसींबद्दल कळवळा आलेल्या डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात सध्या भाजपची ओबीसी जागर यात्रा सुरू आहे. व्हीजेएनटी प्रवर्गात मोडणाऱ्या बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे या यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला. भाजपच्या या यात्रेचा वडेट्टीवार यांनी आपल्या शैलीत चांगलाच समाचार घेतला.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी महाज्योतीबाबत केवळ कागदोपत्री निर्णय घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. चंद्रपूरमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून आपणच पुढाकार घेतला, याचे स्मरण त्यांनी भाजपला करून दिले. दोन वर्षे वसतिगृह बंद होती. क्रिमिलेअरची मर्यादा तेवढीच कायम आहे. केंद्र सरकारनेही ओबीसींसाठी काहीही केलेले नाही. केवळ पंतप्रधान ओबीसी आहेत, असे सांगत समाजाची किती दिवस दिशाभूल करणार, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
केवळ ओबीसींसाठी मंत्रालय स्थापन केल्याने काहीही होत नाही. या समाजासाठी पोटतिडकीने काम करण्याची गरज आहे. भाजप (BJP) ओबीसींच्या प्रेमाचा केवळ दिखावा करीत आहे. डॉ. आशिष देशमुख यांच्यासारखा नेता या यात्रेचे नेतृत्व करतोय, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा काळ जवळ येतोय. त्यामुळे सरकारने कोणता विकास केला, हे सांगण्यासारखे त्यांच्याजवळ काहीच नाही.
परिणामी वेगवेगळ्या समाजाला भुलविण्याचा प्रकार भाजपने सुरू केला, अशी टीकाही त्यांनी केली. आता सरकार मराठा समाजाला गोल गोल फिरवत आहे. आरक्षण द्यायचेच आहे, तर देऊन मोकळे व्हा, असे आव्हानही त्यांनी दिले.
सात जिल्ह्यांची आढावा बैठक सुरू असताना नागपुरात काँग्रेस (Congress) नेते व कार्यकर्त्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समक्ष मोठा राडा झाला. या वेळी पटोले स्वत: उपस्थित होते. यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा, कोणती कारवाई करायची हा सर्वस्वी प्रदेशाध्यक्षांचा अधिकार आहे. त्यामुळे याबाबत ते निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
'इंडिया' आघाडीबाबत अद्याप वरिष्ठस्तरावर चर्चा सुरू आहे. आघाडीची बैठक घ्यायची, की जाहीर सभा यावर विचार सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील नेत्यांना विचारणा झाली आहे. निर्णय झाल्यानंतर याबाबत सर्वांना कळविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.