मुंबई : शिवसेनेतील बंडाळी आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर आलेले संकट यामुळे सत्तासंघर्ष जोरात सुरू आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील असेच सत्तानाट्य रंगले होते. त्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यात 36 दिवसांचा कालावधी गेला होता. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हा संघर्ष आणखी किती दिवस चालणार, असा प्रश्न शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी 2019 चा रेकाॅर्ड मोडणार असल्याचा दावा केला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्ही सत्ता राखू. समजा आम्ही अपयशी झालो तर होऊन होऊन काय होईल तर सत्ता जाईल. त्या सत्तेची आम्ही फिकीर करत नाही. हे सारे भजनलाल आहेत. हरियाणात भजनलाल यांनी काॅंग्रेसचे 40 आमदार फोडले होते. याचा अर्थ भजनलाल यांची संघटना काॅंग्रेस ठरली काय, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच शिवसेना चालते. त्यामुळे आमदार तिकडे गेले तरी सेनेला फरक पडणार नाही.