Aditya Thackeray News : भाजपसोबत पुन्हा जाणार का? आदित्य ठाकरेंचं सर्वात मोठं विधान!
Mumbai News : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील प्रचारसभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक शरद पवार यांना एनडीएसोबत या, अशी खुली ऑफर दिली होती. मोदींनी दिलेल्या या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. मात्र शरद पवारांनी या ऑफरची खिल्ली उडवत, संसदीय लोकशाहीला घातक ठरणाऱ्या शक्तिंसोबत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे म्हटले होते. तर उद्धव ठाकरेंनीही बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द मोडणाऱ्या भाजपसोबत जाणार नसल्याचे सांगितले. दरम्यान या ऑफरबाबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.
एका यू ट्यूब चॅनेलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी याबाबत विधान केले आहे. आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की, "आदित्यजी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. मात्र आता इतकं काही राजकारण घडून गेल्यानंतरही तुम्हाला असं वाटतं का? भविष्यकाळात तुमची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊ शकतात?"
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
या प्रश्नाला उतर देताना आदित्य म्हणाले, "याआधी प्रत्येक गोष्टीत राजकारण येत नव्हतं. आज तुम्ही कुठला रंग घालताय आणि तुम्ही काय खाताय? याच्यावरुन राजकारण होऊ शकतं. आज खेळात राजकारण आलेलं आहे. शाळा - कॉलेजमध्ये राजकारण आलेलं आहे. राजकारण घाणेरड्या प्रकारचं झालं आहे. म्हणजे आम्ही शिकत आलो होती की, 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. आज मटण मांस, मच्छी यावर राजकारण सुरु आहे. नेहरुंची कोण आठवणच काढणार नाही म्हणत, इथर्यंत राजकारण गेलेलं आहे. महाराष्ट्रात शरद पवार साहेब (Sharad Pawar) आणि माझे आजोबा यांची भिन्न राजकीय भूमिका जरी असली, ते वैयक्तिक विरोधक कधीच नव्हते. परिवारामध्येही कधी द्वेष नव्हता."
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पुढे म्हणाले, "महाराष्ट्रातली भाजप आणि एकूणच देशातली भाजपची कार्यपद्धती बघा. गोपाळ शेट्टी, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पूनम महाजन, राज पुरोहित, प्रकाश मेहता या सर्वांना बाजूला काढलं. ज्यांनी भाजप वाढवलं त्यांनाच भाजपने बाजूला केलं. हे सर्व जुने नेते असताना भाजपची विश्वासार्हता होती. आजच्या भाजपकडे विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यांचा दोस्तीत विश्वास नाही. राजकीय पक्षांच्या सहअस्तित्वावर विश्वास नाही. सरकार येतं तेव्हा त्यांना मित्रही नको असतात. भाजपला संविधान बदलायचं आहे, लोकशाही संपवायचं आहे. जो पर्यंत भाजपचे हेतू संविधान बदलायचे आणि लोकशाही संपवायचे आहे, तो पर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.