Mumbai News : 'मनी लॉंड्रिंग'सह सराईत गुंडाशी सबंध असल्याच्या गंभीर आरोपावरून गेले दीड वर्ष तुरुंगात असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दोन महिन्यांचा तात्पुरता जामीन सर्वोच्च न्यायालयाने काल दिला.मात्र,त्यामागे मोठे राजकारण असल्याचा दावा आता केला जात आहे.
राजकीय दबावातून मलिकांना भूमिका घेण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जबाबदार नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने या दाव्याला आणखी बळ मिळाले आहे. त्यांचा रोख अजित पवार तसेच त्यांच्या राष्ट्रवादी गटाकडे आहे. कारण ते राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर सव्वा महिन्यातच मलिकांना जामीन मिळाला. त्यामुळे हा निव्वळ योगायोग आहे का? अशी चर्चा होत आहे.
योगायोग की राजकारण यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. कारण जामीनाचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर बहूधा उद्याच मलिक तुरुंगाबाहेर येतील,असा अंदाज आहे. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करतील. त्यानंतर ते कुठला झेंडा हाती घेणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांच्या सुटकेचे स्वागत करून त्यांना निर्णय घेण्यासाठी पेचात टाकले आहे. मात्र,आपली वाट निर्वेध व्हावी आणि तात्पुरता जामीन कायम होण्याकरीता ते अजित पवार गटाबरोबर जातील,असा राजकीय जाणकारांचे मत आहे.
मलिक बाहेर होते,तोपर्यंत शिवसेनाच नाही,तर राष्ट्रवादीही एकसंध होती. ज्या भाजपच्या आरोपामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले त्यांच्याच सरकारमध्ये आता त्यांचा पक्ष सामील झाला आहे. आता राज्यात सत्तेचे नवीन समीकरण जुळून आले आहे. राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये अजितदादांचाही समावेश आहे. यामुळे दीर्घकालावधीनंतर जामीनावर सुटका मिळालेल्या शरद पवार समर्थक नवाब मलिक पवारांच्या गटात जातात की, अजितदादांच्या नव्या सत्ता समीकरणाशी जुळवून घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.