मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांनी गुरूवारी पुण्यातील सभेत महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार असल्याचे म्हटले होते. त्यावरूनच पडळकर यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा मेंदूत शिरणार नाही. कारण त्यासाठी स्वाभिमान असावा लागतो, असा टोला पडळकरांनी लगावला आहे. (Gopichand Padalkar Latest Marathi News)
गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियात एका व्हिडीओच्या माध्यमातून संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली. ते म्हणाले, जनाब संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे, असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेत केला. कदाचित आम्हा बहुजनांना आपणपण आपल्या सारखेच शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? (Sanjay Raut News)
गेल्या दोन वर्षात एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का? शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली, ते शेतकरी बहुजन नव्हते का? आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळं एसी, एसटी, भटके विमुक्त कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवलं गेलं, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आलं होतं, असे प्रश्न पडळकरांनी उपस्थित केले आहेत.
धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षात घेतली नाही. हे तुमचं कोणतं बहुजन धोरणं होतं? सरकार स्थापनेवेळी तुम्ही प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. पण जेंव्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात. कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता, अशी टीका पडळकरांनी केली आहे.
मुळात तुमची इच्छा हीच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या. बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवी पताका उतरवली. आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबांडाचा तुम्ही रोज सकाळी उठून उधो उधो करता. हे बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. कारण त्या करिता स्वाभिमान असावा लागतो, असा टोला पडळकरांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.