
Mumbai : दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्याचं नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य करणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी हजेरी लावली होती.
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी धर्माधिकारी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध नेतेमंडळी उपस्थित होते. हा सोहळा नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर दिमाखात पार पडला.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले,एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्याचं उदाहरण पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. जीवनात एवढी गर्दी मी कधीच पाहिली नसल्याचे मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. तुमच्या सर्वांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल किती सन्मान आहे समजत असल्याचे शाह म्हणाले. त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केलं आहे. समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यात राहतो हे मी प्रथमच पाहत आहे. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम केलं आहे.
प्रचंड ऊन असतानाही तुम्ही आलात आणि सकाळापासून इथं बसून आहात यावरून तुमच्या मनात आप्पासाहेबांबाबतचा आदर दिसून येतो. दिल्लीतून मी केवळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी आलो आहे. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारनं लाखो लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी योग्य व्यक्तिचा सन्मान केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभारही अमित शाह यांनी यावेळी मानले.
दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य त्यांच्याकडून गेली आठ दशकं सुरू आहे. आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आध्यात्मिक श्रेत्रासह सामाजिक क्षेत्रात दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणं, यासह अनेक कामं या माध्यमातून केली जातात.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.